कर्टुला लागवडीतून शेतकरी झाला मालामाल, तीन महिन्यांत ९ लाखांचे उत्पन्न

| Updated on: Aug 25, 2023 | 7:05 PM

हळदा येथील शेतकरी आनंद बोईनवाड या शेतकऱ्याने कर्टुल्याची शेती फुलवलीय. या शेतीतून बोईनवाड हे लाखो रुपयांची कमाई करीत आहेत.

कर्टुला लागवडीतून शेतकरी झाला मालामाल, तीन महिन्यांत ९ लाखांचे उत्पन्न
Follow us on

नांदेड : पावसाळ्यात रानभाज्या मोठ्या प्रमाणात येत असतात. या रानभाज्यांना बाजारात मोठी मागणी असते. कर्टुले ही एक त्यातील रानमेवा म्हणून प्रसिद्ध असलेली भाजी माळरानावर उगवत असते. या भाजीला बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे आता शेतकरी या कर्टुल्याच्या शेतीकडे वळले आहेत. कर्टुल्याच्या या रानभाजीला तेलंगणा, हैदराबाद, विदर्भातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नांदेड जिल्ह्यातील काही शेतकरी कर्टुल्याची शेती करीत आहेत. 11 हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळते. कर्टुल्याची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे .

नांदेडच्या भोकर तालुक्यातील हळदा येथील शेतकरी आनंद बोईनवाड या शेतकऱ्याने कर्टुल्याची शेती फुलवलीय. या शेतीतून बोईनवाड हे लाखो रुपयांची कमाई करीत आहेत. आनंद बोईनवाड यांनी मागील तीन वर्षापूर्वी आपल्या तीन एकर शेतात कर्टुल्याची लागवड केली. भोकर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी गंगाधर हणमांगे यांच्या मार्गदर्शनाखाली बोईनवाड यांनी कर्टुल्याची लागवड केली.

जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून ही भाजी तोडणीला येते. आरोग्यदायक, अनेक रोगांवर रामबाण उपाय असल्याने बाजारात या रानभाजीला मोठी मागणी आहे. बाजारात तीनशे रुपये किलो दराने ही भाजी विकली जात आहे. बोईनवाड यांनी तीन एकरात कुर्टुल्याची लागवड केली. लागवडीचा खर्च जाऊन बोईनवाड यांना 8 लाख रुपयांचा निवळ नफा झाल्याचे त्यांनी सांगितले.

तीन एकरातून ९ लाखांचे उत्पन्न

आनंदा बोईनवाड म्हणाले, कर्टुले ही रानभाजी आहे. नांदेड येथे रानभाजी महोत्सव घेण्यात आला होता. कार्यक्रमाच्या उद्घाटनापूर्वी कर्टुले राहिले नाही. १०० रुपये किलोच्या भावाने विकले गेले. त्यामुळे तीन एकर कर्टुल्याची लागवड केली. एकरी १५ ते २० क्विंटल उत्पन्न येते. आंध्र, तेलंगणातील लोकं घरी येऊन १०० ते दीडशे रुपये किलोने घेऊन जातात. तीन एकरमध्ये ९ ते १० लाख रुपयांचे उत्पन्न होते. शिवाय मी बियाणेसुद्धा विकतो, असं आनंदा बोईनवाड यांनी सांगितलं.

श्रावण महिन्यात येते

ग्राहक स्वाती कुलकर्णी म्हणाल्या, कर्टुल्यातून व्हीटॅमीन ए मिळते. कर्टुले श्रावण महिन्यात येते. श्रावण सोमवारी कर्टुले खाऊन उपवास सोडावा, असं म्हणतात. ऑगस्ट, सप्टेंबर या दोन महिन्यातच कर्टुल्याचे उत्पादन निघते. आरोग्यदायी असल्याने ग्राहक चवीने खातात.