बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेऊन शेती फुलवली, जोमदार पीकही आलं; पण निसर्गाने घात केला आणि नको ते घडलं…

| Updated on: Apr 13, 2023 | 4:16 PM

राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला, त्यात अनेक शेतकरी उद्ध्वस्त झाले. पण नाशिकच्या एका शेतकऱ्यांची कहाणी ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल.

बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेऊन शेती फुलवली, जोमदार पीकही आलं; पण निसर्गाने घात केला आणि नको ते घडलं...
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : खरंतर शेतकरी हा शेती करत असतांना भांडवल उभं करण्यासाठी कधी हात उसने पैसे घेत असतो तर काही आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेऊन कर्ज घेत असतो. त्यातून आपली शेती फुलवत असतो. काबाड कष्ट करून फुलवलेली शेती आपल्या पदरात किती पैसे देईल याची कुठलीही शास्वती नसतांना शेतमाल विकल्यावर आलेल्या पैशातून सोनं सोडवू असं वचन आपल्या पत्नीला देत असतो. मात्र, जर कधी अस्मानी संकट आलं तर अक्षरशः रंगवलेली स्वप्न तशीच राहून जातात. पदरी निराशाच आल्यानं आर्थिक संकट उभं राहतं. त्यामुळे शेतमालावर आखलेली गणितं ही वारंवार अर्धवट राहिल्यानं तो अनेकदा जीवनच संपवण्याची भाषा बोलू लागतो. तर काही जण हे थेट आयुष्य संपवून टाकत असतात.

सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदाच्या संपूर्ण वर्षात शेतकऱ्यांवर कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट आले आहे. त्यात ते वारंवार ही परिस्थिती निर्माण झाल्याने बळीराजा मेटकुटीला आला आहे.

लासलगाव जवळील चांदवड तालुक्यातील पिंपळद येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय निवृत्ती टोपे यांनी अडीच एकरात उन्हाळ कांद्याचे पिक घेतले होते. यासाठी 70 हजार रुपये पिक कर्ज, पत्नीचे मंगळसूत्र आणि इतर दागिने गहाण ठेऊन कर्ज घेतले होते.

हे सुद्धा वाचा

घेतलेल्या कर्जातून शेतीसाठी भांडवल उभं केलं होतं. त्यात उन्हाळ कांद्याचे पिक घेतले विशेष म्हणजे तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपत पीक जोमदार घेतले. कांदा काढणीला सुरुवात झाली पण भाव नसल्याने साठवण करण्याचा निर्णय घेतला होता.

कांद्याला बाजार भाव नसल्याने बाजार भाव वाढतील तेव्हा हा कांदा विक्री करू या हेतूने चाळीमध्ये साठवण्यासाठी सुरुवात करण्याअगोदरच अस्मानी संकट कोसळले. तीन-चार दिवस सलग गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला.

यामध्ये काढून ठेवलेला आणि शेतातील कांदा ओला झाल्याने सडू लागल्याने दहा ते पंधरा टक्के ही कांदा हातात येणार नसल्याने चित्र आहे. उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक आणि मजुरी ही निघणार नसल्याने आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे.

नुकत्याच आलेल्या अस्मानी संकटाने संपूर्ण स्वप्नांवर पाणी फिरवल्याने कांदा उत्पादक शेतकरी सांगत आहे. लासलगाव येथील कांदा उत्पादक शेतकरी टोपे यांच्याप्रमाणे बहुतांश शेतकऱ्यांची हीच परिस्थिती आहे. त्यामुळे सरकारची मदत किती आणि कधी मिळेल याची प्रतिक्षा बळीराजा करीत आहे.