Amravati : चांदुरच्या तहसीलला कांद्याचे तोरण, राज्य सरकार बदलणार का दराचे धोरण ?

| Updated on: Jun 07, 2022 | 3:44 PM

कांदा हे नगदी पीक असून यामधून चार पैसे मिळतील या आशेपोटी दर हंगामात शेतकरी कांद्याची लागवड करतात. मात्र, या पिकातून उत्पन्न तर सोडूनच द्या पण चार महिने केलेला खर्चही निघत नाही. कारण लागवडीच्या बियाणांपासून ते छाटणीच्या मजुरीपर्यंतचे दरात वाढ झाली आहे. हे सर्व असताना दर घटले आहेत ते कांद्याचे.

Amravati : चांदुरच्या तहसीलला कांद्याचे तोरण, राज्य सरकार बदलणार का दराचे धोरण ?
कांद्याच्या घटत्या दरामुळे चांदुर बाजार तहसील कार्यालयाला कांद्याचे तोरण बांधून निषेध करण्यात आला.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

अमरावती : गेल्या तीन महिन्यापासून (Onion Rate) कांदा दाराचा वांदा हा कायम आहे. कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने उत्पादक त्रस्त आहेत तर सरकारही कांदा दराच्या धोरणामध्ये बदल करीत नाही. त्यामुळे यंदा खरीप आणि रब्बी हंगामातील कांद्यातून शेतकऱ्यांच्या पदरी नुकसानच पडले आहे. सध्याच्या दरातून (Cost of production) उत्पादनावरील खर्च सोडा छाटणी आणि (Onion Market) बाजारपेठेपर्यंतची वाहतूकही परवडत नाही. त्यामुळे सरकारच्या धोरणाचा निषेध करीत चांदुर बाजार तहसील कार्यालयाला कांद्याचे तोरण बांधून सरकारने कांदा दराच्या धोरणात बदल करण्याची मागणी केली आहे. शिवाय विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासकीय कार्यालयाला कांद्याचे धोरण बांधून कांदा दराबाबतच्या धोरणात काय बदल होईल का ते पहावे लागणार आहे.

कांद्याचा असा हा वांदा, खर्च वाढला – उत्पादन घटले

कांदा हे नगदी पीक असून यामधून चार पैसे मिळतील या आशेपोटी दर हंगामात शेतकरी कांद्याची लागवड करतात. मात्र, या पिकातून उत्पन्न तर सोडूनच द्या पण चार महिने केलेला खर्चही निघत नाही. कारण लागवडीच्या बियाणांपासून ते छाटणीच्या मजुरीपर्यंतचे दरात वाढ झाली आहे. हे सर्व असताना दर घटले आहेत ते कांद्याचे. शिवाय दरवर्षी महिन्याभरात दरात सुधारणा होत असते. यंदा मात्र, तीन महिने उलटले तरी दरात घटच होत आहे. निसर्ग व हवामान बदलामुळे कांदा पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागल्याने त्यांचा उत्पादन खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला.मजुरांची टंचाई तसेच मजुरीचे वाढते दर यामुळे त्यात आणखीनच भर पडली.

दराच्या लहरीपणामुळे कांदा उत्पादक अडचणीत

कांद्याचे दर एका रात्रीतून बदलू शकतात. गत वर्षीच्या खरिपात शेतकऱ्यांकडे कांदा नसताना 60 ते 70 रुपये किलो असा दर मिळाला होता. मात्र, लाल कांद्याची आवक घटताच सुरु झालेली दरातील घसरण अजूनही कायम आहे. सध्या कांद्याला 2 किंवा 3 रुपये किलो असा दर मिळत आहे. दरात मोठी तफावत राहत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दुसरीकडे उत्पादनावरील खर्च हा वाढलेला आहे. दराच्या लहरीपणामुळे कांदा क्षेत्र देखील घटते काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा

म्हणून तहसील कार्यालयाला कांद्याचे तोरण

कांदा उत्पादक शेतकरी हा मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला असून उत्पादन खर्चापेक्षा अत्यंत कमी भाव कांद्याला मिळत आहे तरी शासनाकडून शेतकऱ्यांना मदत किंवा मोठे आर्थिक अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार व कृषी अधिकारी यांना भाजपच्या वतीने निवेदन व शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा भेट देवून मागणी केलेली आहे. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष मुरली माकोडे, तालुका सरचिटणीस गोपाल तिरमारे, धम्मराज नवले, सुरेश वानखडे, मयूर खापरे, नितीन टिंगणे, मनीष निमकर, गजानन कोल्हे, आकाश साबळे, प्रवीण राऊत, आकाश आजणकर, शुभम पांडे उपस्थित होते.