चिकूच्या 60 हजारच्या विमा संरक्षणासाठी 51 हजाराचा हप्ता! पालघरच्या शेतकऱ्यांच्या विमा हप्त्यामध्ये सहा पटीने वाढ

| Updated on: Jun 24, 2021 | 12:29 PM

केंद्र शासनाने फळविमा योजने अंतर्गत आपला सहभाग 12.5 टक्‍क्‍यांपर्यंत मर्यादीत केल्याने यांचा अतिरिक्त भार पालघर मधील चिकू उत्पादक शेतकऱ्यांना आणि राज्य शासनाला बसताना पाहायला मिळतोय

चिकूच्या 60 हजारच्या विमा संरक्षणासाठी 51 हजाराचा हप्ता! पालघरच्या शेतकऱ्यांच्या विमा हप्त्यामध्ये सहा पटीने वाढ
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मोहम्मद हुसेन खान, टीव्ही 9 मराठी,पालघर: केंद्र शासनाने फळविमा योजने अंतर्गत आपला सहभाग 12.5 टक्‍क्‍यांपर्यंत मर्यादीत केल्याने यांचा अतिरिक्त भार पालघर मधील चिकू उत्पादक शेतकऱ्यांना आणि राज्य शासनाला बसताना पाहायला मिळतोय. त्याचा परिणाम म्हणून चिकू उत्पादक शेतकऱ्यांना 60 हजाराच्या विमा संरक्षणासाठी 18 हजारांचा हप्ता येत असून विमा हप्त्यात तब्बल सहा पटीने वाढ झाली आहे. तर, 60 हजारांच्या विम्या हप्त्यासाठी राज्य सरकराला 25500, शेतकऱ्यांना 18 हजार रुपये आणि केंद्र सरकारला 7 हजार 500 रुपये असे एकूण 51 हजार रुपये हेक्टरी भरावे लागणार आहे. पालघरच्या शेतकऱ्यांनी या प्रकरणी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे धाव घेतली आहे. (Palghar Farmers Facing Problems due to increase Chiku crop inusrance Premium)

पालघरसाठी सर्वाधिक विमा दर

चिकू फळ पिकासाठी पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 85 टक्के इतका सर्वाधिक विमा दर रिलायन्स जनरल इन्शुरन्स विमा कंपनीने निश्‍चित केला आहे. यामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल सहा पटीने विम्याचा हप्ता जास्त भरावा लागतोय. या परिस्थितीमुळे पालघर मध्ये शेतकऱ्यांमध्ये द्विधा मनस्थिती तयार झाली असून शासनाने या प्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी फळ बागायतदार संघाकडून शासनाकडे करण्यात आली आहे.

पालघरसाठी सर्वाधिक विमा दर

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक योजनेअंतर्गत शासनाने काढलेल्या निवेदनामध्ये पालघर जिल्ह्यातील चिकू उत्पादकांसाठी विमा कंपनीने संरक्षित रकमेच्या तब्बल 85 टक्के विमा भरल्याने 60 हजारांच्या फळपीक विमा संरक्षणासाठी 51 हजार रुपयांचा हप्ता हेक्टरी भरावा लागत आहे. मागील वर्षी या योजनेचे शेतकऱ्यांना तीन हजार रुपये भरावे लागत असताना यंदा शेतकऱ्यांची हप्त्याची रक्कम 18 हजार रुपयांपर्यंत वाढली आहे. त्यामुळे चिकू बागातदार शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्याच पद्धतीने राज्यसरकारचा सहभाग 25500 रुपयांवर पोहचला असून राज्य शासनाला ही याचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागतोय.

11 कोटी 44 लाखांचा विमा परतावा

पालघर जिल्ह्यात सुमारे चार हजार चिकू बागायतदार असून या शेतकऱ्यांकडून चार हजार 300 हेक्‍टर इतक्‍या क्षेत्रावर चिकू लागवड करण्यात येते. गेल्या वर्षी या योजनेत 4057 विमा संरक्षित शेतकऱ्यांना 11 कोटी 44 लाख रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली होती. गेल्या दोन वर्षात 7950 शेतकऱ्यांना विमा कर्जाची 42 कोटी 20 लाख रुपयांची रक्कम दिली गेली असून या योजनेत सहभागी होणाऱ्या विमा कंपन्यांनी चिकू फळपिकासाठी विमा योजनेत सहभागी होण्यास उत्सुकता दाखवली नसल्याने हा परिणाम झाल्याच सांगण्यात येतेय.

विमा परतावा

चिकू फळ हे तीन हंगामात येत असल्याने आंबा , द्राक्ष , तसच इतर फळांच्या तुलनेत चिकू पिकाची जोखीम कमी मानली जाते. मात्र पालघर , ठाणे , पुणे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण आधीच असल्याने जोखमीच्या तुलनेत येथील पिकांसाठी विमा हप्ता अधिक असल्याचं सांगितलं जातंय . मात्र अस असल तरी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना भराव्या लागणाऱ्या विम्याची रक्कम कमी करावी अशी अपेक्षा आता येथील चिकू बागायतदार शेतकरी करू लागले आहेत.

संबंधित बातम्या:

आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न, राज्यभर कृषी संजीवनी मोहीम सुरु, दादाजी भुसेंची माहिती

स्ट्रॉबेरी शेतीतून मोठ्या कमाईची हमी, शेतकऱ्यांना एक एकरात 8 लाखांच्या उत्पन्नाची संधी

(Palghar Farmers Facing Problems due to increase Chiku crop insurance Premium)