मराठवाड्यात रब्बीच्या पेरण्या संथ गतीनेच, काय आहेत कारणे ?

| Updated on: Nov 12, 2021 | 11:05 AM

रब्बीच्या पेरण्या महिन्याभराने लांबणीवर पडलेल्या आहेत. असे असतानाही पेरणी कामांना अद्यापही वेग आलेला नाही. मराठवाड्यात सर्वात आगोदर चाढ्यावर मूठ ठेवली जाते पण यंदा आतापर्यंत केवळ 9 टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. यामध्ये बीड, जालना, औरंगाबाद जिल्हे हे मागे आहेत.

मराठवाड्यात रब्बीच्या पेरण्या संथ गतीनेच, काय आहेत कारणे ?
रब्बी हंगामातील पेरणीला सुरवात झाली आहे पण पेरणीचा वेग मंदावलेला आहे
Follow us on

लातूर : रब्बीच्या (Rabi season) पेरण्या महिन्याभराने लांबणीवर पडलेल्या आहेत. असे असतानाही पेरणी कामांना अद्यापही वेग आलेला नाही. मराठवाड्यात (Marathwada) सर्वात आगोदर चाढ्यावर मूठ ठेवली जाते पण यंदा आतापर्यंत केवळ 9 टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. यामध्ये बीड, जालना, औरंगाबाद जिल्हे हे मागे आहेत. रब्बी हंगामात दरवर्षी ज्वारीवर अधिकचा भर असतो यंदा मात्र, परस्थिती बदलली असून हरभरा आणि गव्हाकडे (Farmer) शेतकऱ्यांचा कल आहे. खरिपात झालेल्या अधिकच्या पावसाचा परिणाम हा आता रब्बी हंगामावरही जाणवू लागलेला आहे.

दरवर्षी ऑक्टोंबर महिन्याच्या अंतिम टप्प्यातच रब्बीच्या पेरण्या ह्या संपलेल्या असतात. यंदा मात्र, अधिकच्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या असून ज्या भागात सर्वात रब्बीची पिके बहरात येत असतात त्याच मराठवाड्यात अद्यापपर्यंत शेतकऱ्यांनी चाढ्यावरच मूठ ठेवलेली नाही. निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम खरिपासह रब्बी हंगामावरही दिसून येत आहे.

पेरण्या लांबण्याचे काय आहे कारण?

मराठवाड्यात ऑक्टोंबर अखेरपर्यंत पावसाने उघडीपच दिलेली नव्हती. त्यामुळे बीड, लातूर, जालना, औरंगाबाद जिल्ह्यातील शेतजमिनी ह्या चिभडलेल्याच होत्या. त्यानंतर जमिनीची मशागत आणि प्रत्यक्ष पेरणीला सुरवात करताना झालेला अवकाळी पाऊस यामुळे पेरणी करण्यास विलंब झाला आहे. शिवाय अधिकच्या पावसामुळे शेतजमिनी ह्या आवळून आल्या होत्या. त्यामुळे अशा अवस्थेत पेरणी केली तर उगवण होते की नाही हा प्रश्न आहे. त्यामुळे योग्य मशागत आणि वेळप्रसंगी शेत जमिन ओलवूनच पेरणी करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिल्याने उशीर झाला आहे.

अद्यापही कापूस, तूर वावरातच

खरिपातील पिकांची काढणी झाल्यावरच मशागत आणि मग रब्बीची पेरणी केली जाते. मात्र, अजूनही खरिपातील तूर आणि कापूस ही मुख्य पिके वावरातच आहेत. त्यामुळे या पिकांची काढणी झाल्यावर पेरणीचा टक्क वाढणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे. सोयाबीनचे क्षेत्र केवळ पेरणीसाठी उपयोगी पडत आहे. याकरिताही पेरणीपुर्व मशागत आणि शेत जमिनी ओलवून पेरा करावा लागत असल्याने विलंब होत आहे.

अशी आहे आकडेवारी

औरंगाबाद जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र 1 लाख 48 हजार 684 हेक्‍टर आहे. त्यापैकी 2457 हेक्‍टरवर अर्थात 1.65 टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जालना जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र 1 लाख 74 हजार 368 हेक्‍टर आहे. त्यापैकी 7878 हेक्‍टरवर, अर्थात 4 टक्‍के पेरणी उरकली आहे. बीड जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र 2 लाख 81 हजार 449 हेक्‍टर आहे. त्यापैकी 45 हजार 565 हेक्‍टरवर, अर्थात 16.19 टक्‍के क्षेत्रावर पेरणी उरकली आहे.

संबंधित बातम्या :

विमा वाटपाचे काम कासवगतीने : राज्यात केवळ 8 लाख 55 हजार शेतकऱ्यांनाच मिळाली नुकसानभरपाई

अतोनात खर्च करुन कांदा पिकवला, पण कवडीचाही भाव नाही, धुळ्यात उभ्या कांद्यावर शेतकऱ्याने रोटाव्हीटर फिरवला

संशोधन समितीच शोधणार आता फळगळतीवर उपाय, संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान