सोयाबीनचे दर वाढूनही आवक घटलेलीच, शेतकरी अपेक्षित दराच्या प्रतिक्षेतच

| Updated on: Nov 22, 2021 | 3:50 PM

शनिवारी 16 हजार पोत्यांची आवक झाली होती तर सोमवारी केवळ 9 हजार पोत्यांची आवक बाजारपेठेत झाली होती. आवक कमी होऊनही दर मात्र, स्थिर राहिलेले आहेत. सोयाबीनच्या दरात आता घट नाही तर वाढच होणार असल्याचा अंदाज आता व्यापारी व्यक्त करीत आहेत.

सोयाबीनचे दर वाढूनही आवक घटलेलीच, शेतकरी अपेक्षित दराच्या प्रतिक्षेतच
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : आता शेतकरी ठरवतेल तोच सोयाबीनला दर मिळणार काय असेच चित्र सध्या बाजारपेठेतले आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोयाबीनची आवक वाढेल असा अंदाज होता. पण (Latur Bazar Samiti) लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चित्र उलटेच होते. शनिवारी 16 हजार पोत्यांची आवक झाली होती तर सोमवारी केवळ 9 हजार पोत्यांची आवक बाजारपेठेत झाली होती. आवक कमी होऊनही दर मात्र, स्थिर राहिलेले आहेत. (Soybean Market Price) सोयाबीनच्या दरात आता घट नाही तर वाढच होणार असल्याचा अंदाज आता व्यापारी व्यक्त करीत आहेत. परंतू, अपेक्षित दर मिळाल्याशिवाय सोयाबीनची विक्रीच नाही असाच निर्धार शेतकऱ्यांनी केला असल्याचे मार्केटमधील वातावरण आहे.

दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. सध्या दर हे स्थिर असून सोयाबीनला 6 हजार रुपये भाव मिळत आहे. दिवाळीपूर्वी सोयाबीनला 4 हजार 800 रुपये दर मिळत होता. मात्र, आता मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने दरात वाढ ही कायम आहे. दुसरीकडे दर वाढला की शेतीमालाची आवक वाढते हे सुत्रच असते पण सोयाबीनबाबत असे होताना दिसत नाही. कारण 1200 रुपयांनी दर वाढूनही आवक ही स्थिर आहे. उलट सोमवारी सोयाबीनची आवक केवळ 9 हजार पोते झाली आहे.

आवक घटली की मागणीत वाढ

आतापर्यंत सोयाबीनच्या दराला घेऊन शेतकरी चिंतेत होता. पण आता अधिकची काळजी ही व्यापाऱ्यांना आणि पोल्ट्री धारकांना करावी लागणार आहे. कारण सोयाबीनचा पुरवठा हा कमी होत आहे. शेतकऱ्यांकडे सोयाबीन असतानाही ते विक्रीसाठी आणले जात नाही. म्हणूनच दरात कायम तेजी दिसत आहे. तर आयात केलेले सोयापेंड आणि सोयाबीन यांच्या दरात फार मोठी तफावत नसल्याने प्रक्रिया उद्योजक हे स्थानिक पातळीवरील सोयाबीनलाच अधिकची पसंती देत आहेत. त्यामुळे एकतर सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे अन्यथा दर हे स्थिर राहत आहेत.

दर 6 हजारावर आवक मात्र, 9 हजार पोत्यांची

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ जिल्ह्यातूनच नाही तर उस्मानाबाद, सोलापूर, बीड, नांदेड या जिल्ह्यांसह कर्नाटकातूनही सोयाबीनची आवक दरवर्षी होत असते. यंदा मात्र, गरज असेल तरच सोयाबीनची विक्री अन्यथा साठवणूक हाच पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे सोमवारी 6 हजार 150 रुपये क्विंटलचा दर असतानाही सोयाबीनची आवक हा केवळ 9 हजार पोत्यांची झाली होती. दरवर्षी दिवाळी झाली की सोयाबीनची आवक ही 50 ते 60 हजार क्विंटलची असते यंदा उत्पादनात घट झाली असली तरी पदरी पडलेले सोयाबीन साठवणूक करण्यावरच शेतकरी भर देत आहेत. भविष्यात सोयाबीनच्या दराच अणखीन वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

तीन दिवसांपासून सोयाबीनचे दर स्थिरावलेलेच

दिवाळीनंतर दरामध्ये सातत्याने वाढ होत होती. अखेर गेल्या तीन दिवसांपासून सोयाबीनचे दर हे 6 हजार 200 रुपयांवर स्थिरावलेले आहेत. शिवाय ढगाळ वातावरण असल्यानेही आवक कमी होत आहे. सध्या सोयाबीनचे दर हे स्थिरावलेले असले तरी भविष्यात सोयाबीन हे वाढणारच. त्याशिवाय प्रक्रिया उद्योजक आणि होणारी मागणी याचा फायदा शेतकऱऱ्यांना होणार आहे. त्यामुळे अजून काही दिवस शेतकऱ्यांनी प्रतिक्षा केली तर वाढीव दर मिळणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

संबंधित बातम्या :

महाअभियनातून वाढणार रेशीम उद्योग, मराठवाड्यातील शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ

दुष्काळात तेरावा..! पावसाच्या पाण्यात शेतकऱ्यांचे सोयाबीन, नुकसानभरपाई मिळणार तरी कशी?

फळबागांमध्ये साचलेले पाणी धोकादायकच, आंबा बागेची घ्या अशी काळजी