उन्हाळ्यात दुभत्या जनावरांची ‘अशी’ घ्या काळजी अन्यथा होईल नुकसान, काय आहे तज्ञांचा सल्ला?

| Updated on: Mar 08, 2022 | 5:17 AM

उन्हामुळे मानवी शरीराची जसी लाहीलाही होते त्याच प्रमाणे जनावरांनाही वाढत्या उन्हाचा त्रास हा होतोच. म्हशींमध्ये उष्णतेस असणारी कमी प्रतिकारशक्ती यामुळे दूध उत्पादनावर, शरीर पोषणावर व प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. दूध देणाऱ्या जनावरांना थंड हवामान मानवते. जनावरे सतत उन्हाच्या संपर्कात येत असतील. तर त्याच्या आरोग्यावर परिणाम हा होतोच.

उन्हाळ्यात दुभत्या जनावरांची अशी घ्या काळजी अन्यथा होईल नुकसान, काय आहे तज्ञांचा सल्ला?
भर उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई बरोबर चारा टंचाईही निर्माण झाली आहे.
Follow us on

पुणे :  (Summer Season) उन्हामुळे मानवी शरीराची जसी लाहीलाही होते त्याच प्रमाणे (Animal) जनावरांनाही वाढत्या उन्हाचा त्रास हा होतोच. म्हशींमध्ये उष्णतेस असणारी कमी प्रतिकारशक्ती यामुळे दूध उत्पादनावर, शरीर पोषणावर व प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. दूध देणाऱ्या जनावरांना थंड हवामान मानवते. जनावरे सतत उन्हाच्या संपर्कात येत असतील. तर त्याच्या (Animal Health) आरोग्यावर परिणाम हा होतोच. वाढत्या तापमानामुळे चारा खाण्याचे प्रमाण कमी होते व पाणी पिण्याचे प्रमाण वाढते, दुधात घट होते. दिवसा म्हशी कमी चरतात आणि संध्याकाळी चरण्याकडे त्यांचा जास्त कल असतो. उष्णतेच्या वाढत्या प्रमाणाबरोबर जनावरांचे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढत जाते. उन्हाळ्यात जनावरांना अल्प खाद्य, कमी व वाळलेला चारा, अल्प पाणी व अति उष्णता यांचा त्रास होतो. जगण्यासाठी आवश्‍यक त्याच शरीरक्रियांचा शरीरास बराच ताण असतो. त्यामुळे प्रजननक्रिया थांबते किंवा प्रजननक्रियेस हानी होते. मार्च ते जून या काळात वातावरणातील उष्णता फार वाढते आणि त्यामुळे जनावरे माजावर येण्याचे थांबते.

प्रजननामध्ये या अडचणींचा सामना

उन्हाळ्यात गाई-म्हशींप्रमाणेच वळू व रेडे यांची प्रजननक्षमता कमी होते. प्रामुख्याने वीर्याची प्रत कमी झाल्याने नैसर्गिक रेतनामुळे जनावरे गाभण न होण्याचे आणि उलटण्याचे प्रमाण वाढते. तेव्हा वळू व रेडे यांचा प्रजननासाठी उपयोग करून दिवसाआड एकच जनावर भरवल्यास ही जनावरे उलटणार नाहीत. उन्हाळ्यात गाभण असलेल्या जनावरांची काळजी घेणे महत्त्वाचे असते. कारण जन्मणाऱ्या वासराची प्रजननक्षमता ही त्याच्या गर्भावस्थेपासून झालेल्या पोषणावर अवलंबून असते. संकरित व विदेशी जनावरे उन्हाळ्यातील अति उष्णतेचा त्रास सहन करू शकत नाहीत. या काळात जनावरे सकाळी व दुपारी उशिरा चरावयास नेणे, दुपारच्या रखरखत्या उन्हाच्या वेळी गोठा अथवा सावलीत बांधणे, त्यांना मुबलक व स्वच्छ पाणी देणे असे उपाय योजल्यास संकरित व विदेशी गाई उन्हाळ्यातही माजावर येतील.

चारा व पाण्याचे व्यवस्थापन

जनावरांना दिवसभरात लागणारा चारा एकाचवेळी देण्याऐवजी समान विभागणी करून 3 ते 4 वेळेस द्यावा. चाऱ्याची नासाडी टाळण्यासाठी त्याची बारीक कुट्टी करावी. चारा तसाच टाकला तर 30 टक्के वाया जातो. हिरवा चारा उपलब्ध असल्यास वाळलेला चारा यांचे मिश्रण करावे. वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचे किंवा गुळाचे पाणी शिंपडाल्याने जनावरे अधिक आवडीने चारा खातात.अति उष्णतेचा जनावरांच्या आहारावर, दूध उत्पादनावर व प्रजननक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो, म्हणून जनावरांना रांजणातील पाणी पाजावे.

अशी घ्या जनावरांच्या आरोग्याची काळजी

उन्हाळ्यात अपुरा चारा व निकृष्ट आहारामुळे जनावरे अशक्त बनून त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते व ते विविध रोगांना बळी पडतात, म्हणून पशुतज्ज्ञांकडून वेळीच जनावरांना लाळ-खुरकूत, घटसर्प, फऱ्या रोगाची लस टोचावी. परोपजीवी जंतूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जंतुनाशक औषधे पाजावीत. जनावरांचा गोठा व परिसर स्वच्छ असावा. मलमूत्राची व्यवस्थित विल्हेवाट लावल्याने जनावरे आजारी पडणार नाहीत.

(टीप : सदरील बातमी पशूवैद्यकीय अधिकारी डॉ.केंद्रे यांनी दिलेल्या माहितीवरुन केलेली आहे )

संबंधित बातम्या :

कृषी विभागाच्या एका निर्णयामुळे हळदीला चढणार ‘पिवळा’ रंग, नेमके धोरण काय ? वाचा सविस्तर

Chickpea Crop: खरेदी केंद्रावर सुविधांपेक्षा अडचणी अधिक, उत्पादन वाढले पण विकायचे कुठे?

Soybean Market : सोयाबीनची आवक वाढली, आठवड्याच्या पहिल्या दिवशी दराचे काय?