Unseasonal Rain : अवकाळी पावसाने नंदुरबार जिल्ह्याला झोडपले, महसूल विभागातील कर्मचारी संपावर, शेतकरी म्हणतात…
लागवडीवर केलेला खर्च देखील निघणार नसल्याची परिस्थिती शेतकऱ्यांसमोर उभी आहे. त्यामुळे शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भात काहीतरी योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी बळीराजा करू लागला आहे.
जितेंद्र बैसाणे, नंदूरबार : नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात सोमवारी रात्री अवघड पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं (Farmer) अतोनात नुकसान झालं आहे. एका आठवड्यात दोनदा अवकाळी पाऊस झाला असून पहिल्या पावसाचे पंचनामे पूर्ण होत नाही, तेवढ्यात दुसऱ्यांदा देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र कृषी विभागाने शेतीक्षेत्रातील प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. दुसरीकडे महसूल विभागातील (Department of Revenue) अधिकारी कर्मचारी जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी संपावर गेले असून, शेतकरी आता वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. या अवकाळी पावसात जीवितहानी झालेली नसल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे. या अवकाळी पावसात पंचनामे झाल्यानंतरच नुकसान किती झालंय हे स्पष्ट होईल. मात्र संपामुळे पंचनामे कधी होणार असे काहीच प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. त्यामुळे मायबाप सरकारने लवकर काहीतरी करावं आणि शेतकऱ्यांच्या तोंडात गोड घास घालावा एवढीच माफक अपेक्षा शेतकरी राजा करू लागला आहे.
नंदूरबार जिल्ह्यात उन्हाळी लागवड करण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाळी पीक म्हणून बाजरी, डांगर, टरबूज, मका, यासारखे पारंपरिक पीक सोडून सद्या स्थितीत ऐन उन्हाळ्यात ऊस पीक घेण्याकडे आता मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी ऊस लागवडीकडे अधिक भर देत आहेत. जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे पिकांना धोका निर्माण होणार आहे, तर दुसरीकडे पिकांना भावना त्यांनी शेतकरी आता ऊस लागवडीकडे अधिक वाढताना दिसून येत आहे. ऊस शेतीला ठिबकद्वारे पाणी दिल्याने पाणी देखील कमी लागत असतं. मात्र ऊसाला चांगला भाव मिळावा एवढीच अपेक्षा आता शेतकरी करत असल्याने ऊस लागवडीकडे अधिक भर देत आहे.
शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. दिवाळीत कापूस निघाल्यानंतर शेतकऱ्यांच्या घरी गोडधोड होते. मात्र, भावच नसल्याने कापूस घरातच पडून होता. आज ना उद्या भाव मिळेल, या आशेवर कापसाचे ढीग वाढत गेले. आता होळीही गेली तरी कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. आणखी किती दिवस कापूस ठेवायचा, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. उत्पादन खर्च वाढूनही कापसाचा भाव आठ हजारांच्या पुढे जात नाही आहे. लागवडीवर केलेला खर्च देखील निघणार नसल्याची परिस्थिती शेतकऱ्यांसमोर उभी आहे. त्यामुळे शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भात काहीतरी योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी बळीराजा करू लागला आहे.