आयकर रिटर्न भरण्याची मुदत वाढवावी, मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती

मुदतीनंतर करभरणा केल्यास लागणारा दंड, शुल्क आणि व्याजदेखील माफ करावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांना केली. (CM requests Finance Minister)

आयकर रिटर्न भरण्याची मुदत वाढवावी, मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती
| Updated on: Mar 20, 2020 | 10:20 AM

मुंबई : आर्थिक वर्ष 2018-19 चे सुधारित आणि उशिराचे आयकर रिटर्न भरण्याची 31 मार्चची मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे राज्यात नागरिकांना घरी राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अनेक सेवा-सुविधांच्या डेडलाईनही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. (CM requests Finance Minister)

234 बी अंतर्गत व्याज वाचवण्यासाठी अग्रिम कर भरण्याची तसेच 30 एप्रिलची टीडीएस भरण्याची मुदतही वाढवून द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. फेब्रुवारी 2020 ची जीएसटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 22 मार्च आहे. त्यालाही मुदतवाढ देण्यास मुख्यमंत्र्यांनी सुचवलं आहे.

मुदतीनंतर करभरणा केल्यास लागणारा दंड, शुल्क आणि व्याजदेखील माफ करावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांना केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन काय निर्णय घेतात, याकडे करदात्यांचे डोळे लागले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला ‘जनता कर्फ्यू’ पाळा असे आवाहन केले. “सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत कोणीही घराबाहेर पडू नका, अत्यंत आवश्यक असेल, पर्याय नसेल तरच त्या दिवशी बाहेर जा” असेही पंतप्रधान म्हणाले.

“या संकटाच्या वेळी माझे देशातील व्यापाऱ्यांना, उच्चवर्गाला आवाहन आहे की, तुम्ही ज्या व्यक्तींकडून सेवा घेता, त्यांचे आर्थिक हित लक्षात घेऊन त्यांचा पगार कापू नका,” असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.

“दूध, खाण्या-पिण्याच्या वस्तू, औषध किंवा जीवनावश्यक गोष्टी यांची तूट भासू नये यासाठी आवश्यक पावलं उचलली जात आहेत. त्यांचा साठा करु नका,” असे आवाहनही मोदींनी केले आहे. (CM requests Finance Minister)