महागाईचा पाच वर्षांमधील उच्चांक, सामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं

| Updated on: Jan 14, 2020 | 11:12 PM

सध्या महागाईने मागील 5 वर्षांमधील उच्चांक गाठल्याचं नव्याने समोर आलेल्या आकडेवारीनुसार उघड झालं आहे (Highest Inflation Rate in Five year).

महागाईचा पाच वर्षांमधील उच्चांक, सामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं
Follow us on

मुंबई : सध्या महागाईने मागील 5 वर्षांमधील उच्चांक गाठल्याचं नव्याने समोर आलेल्या आकडेवारीनुसार उघड झालं आहे (Highest Inflation Rate in Five year). यावर्षी महागाई दर 7.35 टक्क्यांवर पोहोचला आहे. सरकारच्या सांख्यिकी विभागाकडून आलेल्या आकडेवारीवरुनच हे समोर आलं आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचं अक्षरशः कंबरडं मोडलं आहे. दूध, डाळी, भाज्या यासारख्या दररोजच्या वापरातील वस्तूही प्रचंड महागल्या आहेत.

यावर्षी महागाई दर 7.35 टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती सरकारच्या सांख्यिकी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरुन समोर आली आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजेच जुलै 2014 मध्येही देशातील महागाई दर साधारण इतकाच (7.39 टक्के) असल्याची माहिती बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ देतात.

वाढत्या महागाईने जनतेत संतापाची लाट आहे. कांदा, लसून तर खरेदी करण्याच्या क्षमतेबाहेर असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. यावर बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी देखील सरकारचे कान उघडले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पथधोरणानुसार किरकोळ महागाई निर्देशांक 5% गेल्यास अर्थव्यवस्थेची धोक्याची घंटा वाजू लागते, असं मत विश्वास उटगी यांनी व्यक्त केलं आहे.

किरकोळ महागाई दराने साडेपाच वर्षातील उच्चांक गाठला आहे. डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर 7.35 टक्क्यांवर गेला. नोव्हेंबरच्या तुलनेत त्यात वाढ झाली आहे. डिसेंबरचा मूळ महागाई दर 3.7 टक्के आहे. नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई दर 5.54 टक्के होता. डिसेंबर महिन्यात कांद्याचा दरही दीडशे रुपयांवर गेला होता, तर डिसेंबर 2018 मध्ये तो 2.11 टक्के इतका कमीही राहिला होता.

रिझर्व्ह बँक येत्या 6 फेब्रुवारी रोजी पतधोरण जाहीर करणार आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना महागाई दर आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

“महागाईने नागरिक बेजार असताना सरकारकडून धार्मिक मुद्द्यांवर राजकारण”

महागाई दराने साडेपाच वर्षांमधील उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सर्व साधारण नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. असं असताना सरकार धर्माचे मुद्दे पुढे करुन राजकारण करत आहे. वाढत्या महागाईवर अंकुश लावण्यात सरकार आणि आरबीआय सपशेल अपयशी ठरले आहेत. तसेच घाऊक बाजार निर्देशांक आणि अखिल भारतीय ग्राहक निर्देशांक दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, असंही विश्वास उटगी यांनी नमूद केलं.