Cyrus Mistry : सायरस मिस्त्रींच्या मृत्यूसंदर्भात मर्सिडीजचं मोठं वक्तव्य, काय म्हटलं कंपनीनं?

| Updated on: Sep 07, 2022 | 10:47 AM

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अपघाताच्या तपासात आम्ही अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करत आहोत, असे मर्सिडीज बेंझ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.

Cyrus Mistry : सायरस मिस्त्रींच्या मृत्यूसंदर्भात मर्सिडीजचं मोठं वक्तव्य, काय म्हटलं कंपनीनं?
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9
Follow us on

लक्झरी कार बनवणारी कंपनी मर्सिडीज बेंझच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी स्पष्ट केले, की ते टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अपघाताच्या तपासात अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करत आहेत. सायरस मिस्त्री आणि त्यांचे मित्र जहांगीर पंडोले यांचा रविवारी दुपारी महाराष्ट्रातील (Maharashtra) पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. या अपघातात गाडीतील अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले. हे सर्व जण मर्सिडीजच्या एसयूव्ही मॉडेल जीएलसी 220मधून प्रवास करत होते. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर चारोटी परिसरात सूर्या नदी पुलावर त्यांचा साडे तीनच्या दरम्यान हा अपघात (Accident) झाला. यावेळी गाडीत मागे बसलेल्या मिस्त्री यांनी सीटबेल्ट लावलेला नसल्याची माहिती समोर आली आहे.

तपासात आवश्यक ती सर्व मदत करू – मर्सिडीज

सायरस मिस्त्री यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईतील वरळी येथील एका इलेक्ट्रिक शवदाहिनीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मर्सिडीज कंपनीने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की ते अपघाताशी संबंधित तपासात आवश्यक ती सर्व मदत करत आहेत. ‘एक जबाबदार ब्रँड म्हणून आम्ही आमच्या ग्राहकांच्या गोपनीयतेचा आदर करतो, आमची टीम अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे कंपनीतर्फे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गरज पडल्यास आम्ही तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना आवश्यक असेल ती माहिती देऊ, असेही कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच आमची वाहने नव्या उत्तम सुरक्षा वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज करून, रस्त्यावरील सुरक्षेबाबात जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू राहतील, असेही कंपनीने नमूद केले आहे.

मिस्त्री यांच्या अकाली निधनाचं तीव्र दु:ख – मर्सिडीज

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांचे रस्ते अपघातात अकाली निधन झाल्यामुळे आम्हाला खूप दु:ख झाले आहे, असे कंपनीने म्हटले आहे. तसेच अनाहिता पंडोले आणि डेरिअस पंडोले यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे ऐकून आम्हालाही आनंद झाला आहे. त्यांना लवकर बरं वाटावं यासाठी आम्ही शुभेच्छा देतो, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले. त्यापूर्वी कंपनीच्या पथकाने अपघातग्रस्त वाहनाची माहिती गोळा केली आहे. यांच्या आधारे पुढील विश्लेषण केले जाईल.

हे सुद्धा वाचा

अपघाताच्या वेळी गाडीचा वेग होता जास्त

अपघातग्रस्त कारच्या टायरमधील हवेचा दाब आणि ब्रेक फ्लुइडची पातळीही तपासली जाईल, अशी माहिती कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी पीटीआयला दिली. त्यामुळे अपघाताच्या कारणांची स्पष्ट कल्पना येईल, असे ते म्हणाले. अपघाताच्या वेळी मिस्त्री यांची मर्सिडीज गाडी अत्यंत वेगाने धावत होती, असे पोलीस अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासात सांगितले होते. याशिवाय मागच्या सीटवर बसलेले मिस्त्री आणि जहांगीर यांनी सीट बेल्टही घातले नव्हते.

सीटबेल्ट न लावल्यास दंड आकारणार : नितीन गडकरी

सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधननंतर केंद्र सरकारने एक निर्णय घेतला आहे. कारमध्ये मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांनाही सीटबेल्ट (Seat Belt) लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. सीटबेल्ट न लावल्यास आरटीओकडून दंड आकारण्यात येईल. केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सीट बेल्टबाबत ही घोषणा केली आहे.