Moody’s on India GDP: जग संकटात, तर भारत सुसाट, विकास दर 7 टक्के राहण्याचा अंदाज
Moody’s on India GDP: जग संकटात असताना भारतीय अर्थव्यवस्थेला जणू पंख लागलेले आहेत. जपानमधील संस्थानंतर आता जागतिक संस्थांनी भारताच्या विकास दराबाबत मोठे अंदाज वर्तवले आहेत. आशियाचे ग्रोथ इंजिन म्हणून भारत भरारी घेत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

जागतिक बाजारावर युद्धाचा तणाव, महागाई आणि आर्थिक अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत. पण भारतीय अर्थव्यवस्थेने दणदणीत कामगिरी बजावली आहे. जपानमधील संस्थानंतर आता जागतिक रेटिंग एजन्सी मूडीज रेटिंग्सने (Moody’s Rating) भारताच्या आर्थिक विकासाबाबत मोठे भाकीत केले आहे. ताज्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2026-27 साठी भारताचा विकास दर वाढीचा अंदाज 6 टक्क्यांवरून 7 टक्के करण्यात आला आहे. देशातंर्गत भक्कम मागणी, पायाभूत सुविधांवरील सरकारी खर्चामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याचे मूडीजचे आकलन आहे. तर संकट आलं तरी ते सहन करण्याची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत असल्याचा दावा या रेटिंग संस्थेने केला आहे.
अर्थव्यवस्था सुसाट धावणार, मूडीजचा असा दावा का?
मध्य-पूर्वेतील तणावामुळे जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांचा प्राणवायू कमी झाला आहे. या अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर आहेत. पण भारतावर त्याचा परिणाम झालेला नाही. देशातंर्गत खासगी वापर आणि केंद्र सरकारच्या पायाभूत सुविधांवरील विक्रमी खर्चामुळे अर्थव्यवस्था भक्कम स्थिती आहे. मूडीजच्या अहवालानुसार, 2026 मधील पहिल्या सहा महिन्यात भारताचे सकल देशातंर्गत उत्पादन (जीडीपी) दर 8.2 टक्के नोंदवला गेला आहे. तर 2025 मध्ये हा दर 7.3 टक्के इतका होता. मूडीजने भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा विश्वास दाखवला आहे. यापूर्वी आर्थिक वर्ष 2026 मध्ये अर्थव्यवस्था 7.7 टक्के तर त्या आधी 7.1 टक्के दराने अर्थव्यवस्था दुडुदुडू धावली होती.
जागतिक संस्थांचा काय अंदाज?
मूडीज या जागतिक रेटिंग संस्थेने देशाचा विकास दर 7 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे
IMP ने जुलैमध्ये 6.4 टक्के विकास दराचा अंदाज व्यक्त केला आहे
S&P Global चा जूनमध्ये 6.6 टक्के विकासाचा दावा
भारतीय रिझर्व्ह बँकेने विकास दर 6.6 टक्के असेल असे म्हटले आहे
महागाई आणि बाह्य संकटांचा मजबुतीने सामना
सध्या जगावर ऊर्जा संकट घोंगावत आहे. आखातात, खाडी देशांमध्ये युद्ध संघर्ष पेटला आहे. इराणविरोधात अमेरिका, इस्त्रायल होते. आता हुतींनी सौदी अरबवर केलेल्या हल्ल्याने युद्धाची व्याप्ती वाढली आहे. हिजबुल्ला इस्त्रायलविरोधात लढत आहे. त्याचा परिणाम जगातील अनेक अर्थव्यवस्थांवर होत आहे. इंधन संकट उभे ठाकले आहे. त्याचवेळी भारताने एकाच देशावर अवलंबून न राहता अनेक देशांकडून कच्चे तेल आयातीचा पर्याय खुला केला आहे. परकीय गंगाजळीही मुबलक आहे. संकटापूर्वीच त्याच्यावर उपाय शोधल्याने भारतीय अर्थव्यवस्था महागाई आणि बाह्य संकटांचा मजबुतीने सामना करेल असा दावा जागतिक रेटिंग एजन्सी करत आहेत.