Paytm मध्ये महाभरती, तब्बल 4000 जणांना नोकरी मिळणार; कंपनी लवकरच…प्लॅन काय?

पेटीएमने ही भरती प्रकिया मार्च 2027 पर्यंत राबवली जाईल, असे सांगितले आहे. कंपनीने सांगितल्यानुसार गेल्या दोन महिन्यात 800 पेक्षा जास्त लोकांना पेटीएममध्ये नोकरी देण्यात आली आहे.

Paytm मध्ये महाभरती, तब्बल 4000 जणांना नोकरी मिळणार; कंपनी लवकरच...प्लॅन काय?
paytm recruitment
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 09, 2026 | 4:48 PM

Paytm Recruitment : देशातील प्रमुख फिनटेक कंपन्यांपैकी एक असलेल्या पेटीएम या कंपनीने एक खुशखबर दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीकडून पुढील साधारण नऊ महिन्यात एकूण 4000 नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया झाल्यानंतर प्रत्येकाच्या कामगिरीचा अभ्यास करून एकूण 400 कर्मचारी कमीदेखील केले जाणार आहेत. पेटीएम कंपनीला आगामी काळात आपल्या मर्चंट नेटवर्कला मजबूत करणार आहे. तसेच भविष्यात ही कंपनी एआयवर आधारलेल्या सेवांवरही भर देणार आहे. त्यामुळेच या कंपनीकडून तब्बल 4000 नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.

पेटीएममध्ये होणार 4000 कर्मचाऱ्यांची भरती

मिळालेल्या माहितीनुसार पेटीएमने ही भरती प्रकिया मार्च 2027 पर्यंत राबवली जाईल, असे सांगितले आहे. कंपनीने सांगितल्यानुसार गेल्या दोन महिन्यात 800 पेक्षा जास्त लोकांना पेटीएममध्ये नोकरी देण्यात आली आहे. आता आणखी 4000 कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही नवी भरती प्रोडक्ट, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता या विभागात केली जाणार आहे. आपल्या मर्चंट नेटवर्कला वेगाने वाढवण्यासाठी तसेच एआयवर आधारलेल्या सर्व्हिसचा आणखी विस्तार करण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सध्या पेटीएम कंपनीकडे 40 हजार कर्मचारी काम करतात. त्यानंतर आता कंपनीच्या कर्मचाऱ्यांत आणखी 10 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाणार

एकीकडे पेटीएम भविष्यात एकूण 4000 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे, असे सांगण्यात आले आहे. परंतु दुसरीकडे परफॉर्मन्स अप्रेजल सायकल पूर्ण झाल्यानंतर साधारण एक टक्के म्हणजेच 400 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार आहे.

2010 साली झाली कंपनीची सुरुवात

दरम्यान, पेटीएम कंपनीने गेल्या चार तिमाही निकालात नफा नोंदवला आहे. कायदेशीर आव्हान मिळाल्यावर या कंपनीने आपल्या कारभारात अनेक बदल केले आहे. या कंपनीचे सीईओ विजय शेखर शर्मा हे आपल्या कोट्यवधी युजर्सना कर्ज, गुंतवणूक तसेच अन्य आर्थिक सेवांच्या माध्यमातून कंपनीशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. ही कंपनी 2010 साली सुरू झाली होती. या कंपनीकडून अगोदर मोबाईल रिचार्जचे काम केले जायचे. त्यानंतर ही कंपनी डिजिटल आर्थिक व्यवहार तसेच बँकिंग क्षेत्रात आली.

Follow Us