कराड बँकेच्या दोन लाख ठेवीदारांची चिंता वाढली, बँक बंद झाली पण पैसे कसे मिळणार?

| Updated on: Dec 09, 2020 | 2:24 PM

कराड जनता बँकेचे एकूण एक लाख 99 हजार 761 ठेवीदार आहेत. त्यांच्या ठेवी 516 कोटी 35 लाख इतक्या आहेत.

कराड बँकेच्या दोन लाख ठेवीदारांची चिंता वाढली, बँक बंद झाली पण पैसे कसे मिळणार?
Follow us on

सातारा : कराड जनता बँकेचा (karad janata sahakari bank) परवाना रद्द रिझर्व्ह बँकेकडून (rbi) रद्द करण्यात आल्यामुळे सातारा जिल्हयातील ठेवीदार हतबल झाले आहेत. कराड जनता बँकेचे एकूण एक लाख 99 हजार 761 ठेवीदार आहेत. त्यांच्या ठेवी 516 कोटी 35 लाख इतक्या आहेत. यापैकी पाच लाखाच्या आतील एक लाख 99 हजार 163 ठेवीदार आहेत. त्यांची रक्कम 431 कोटी 62 लाख 95 हजार इतकी आहे. पाच लाखापर्यंतच्या ठेवींना विम्याचे संरक्षण आहे. त्यामुळे 5 लाख पर्यंतच्या ठेवी परत देण्यासाठी विम्याचे प्रस्ताव तयार करण्यात येतील अशी माहिती बँकेकडून देण्यात आली आहे. (rbi cancels licence of karad janata sahakari bank depositors await for full payment)

तर मिळालेल्या माहितीनुसार, या प्रक्रियेला पुढील चार ते पाच महिन्याचा कालावधी लागणार असल्याचंही बँकेकडून सांगण्यात आलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात जनता बँकेच्या 29 शाखा आणि 2 विस्तारीत कक्ष असून पुणे, मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर इथं या शाखा कार्यरत आहेत. त्याही बंद करण्यात येणार असल्याने ठेवीदार हतबल झाले आहेत. यामुळे आज सकाळपासून मार्केट यार्ड शाखेत गर्दी करू लागले आहेत.

या आधी 7 नोव्हेंबर 2017 रोजी रिझर्व्ह बँकेने कराड जनता बँकेवर निर्बंध घातले होते. या निर्बंधांचं उल्लंघन केलं म्हणून 6 ऑगस्ट 2019 ला या बँकेवर प्रशासक नेमण्यात आले होते. ठेवी परत करण्याबाबत आणि वसुलीबाबत कोणतीच प्रगती दिसून न आल्याने रिझर्व्ह बँकेने अखेर कराड जनता बँक दिवाळखोरीत काढण्याचे आदेश सोमवारी रात्री काढले. यामुळे आता ग्राहकांची चिंता वाढली आहे.

कोणी बुडवली बँक?

कराड जनता बँक दिवाळखोरीत गेल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडीने या बँकेचा परवाना रद्द केला आहे. पण बँकेची ठरवून लूट केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कराड जनता बँक दिवाळखोरीत निघाली नसुन रिझर्व्ह बँक, सहकार खाते आणि संचालक मंडळाने ठरवून पद्धतशीरपणे बँकेची लुट केली असल्याचा आरोप बॅक खातेदार राजेंद्र पाटील यांनी केला आहे.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँक खातेदार राजेंद्र पाटील यांनी बँकेत बोगस कर्ज वाटप होत असल्याबाबत 2015 साली मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 550 कोटी ठेवी असणाऱ्या कराड जनता बँकेतून 425 कोटी कर्ज वाटप झाले. त्यातील चारच खाते दारांना 390 कोटींचे बोगस कर्ज वाटप करण्यात आले. या कर्जात आजपर्यंत एक रुपायाही परत आला नाही. याकडे वेळीच रिझर्व्ह बँकेकडे तक्रार केली. मात्र, पद्धतशीर दुर्लक्ष करण्यात करण्यात आल्याचा आरोप राजेंद्र पाटील यांनी केला आहे.

राजेंद्र पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना यासंबंधी माहिती दिली आहे. त्यामुळे कराड जनता बँकेला नेमकं कुणी बुडवलं अशा चर्चांना आता उधाण आलं आहे. दरम्यान, कराड जनता बँक ही सातारा जिल्ह्यात एक नावाजलेली बँक आहे. सहकाराच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या या बँकेचे हजारो ठेवीदार आहेत. या बँकेवर 2017 साली रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले होते. त्यानंतर आता ही बँक दिवाळखोरित गेल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. ही अधिकृत घोषणा सहकार आयुक्तांनी केली आहे. त्यामुळे या घोषणेनंतर आता ठेवीदारांच्या पैशांचं काय?, असा प्रश्व विचारला जाऊ लागला आहे. (rbi cancels licence of karad janata sahakari bank depositors await for full payment)

इतर बातम्या –

पैशाला पैसा जोडून मिळवा बक्कळ पैसा, ‘या’ 5 पद्धतीने करा गुंतवणूक

महाराष्ट्रातल्या आणखी एका बँकेचा परवाना रद्द, ग्राहकांना कसे मिळणार पैसे परत?

(rbi cancels licence of karad janata sahakari bank depositors await for full payment)