एकच जिद्द रिफायनरी रद्द, नाणारवासियांचा निर्धार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

मुंबई : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमेवरील प्रस्तावित नाणार तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प रद्द करावा, या मागणीसाठी 17 गावातील 4 हजारहून अधिक स्थानिक नागरिकांनी मुंबईत आझाद मैदानात आंदोलन सुरु केले. कालपासून (27 नोव्हेंबर) सुरु झालेले हे आंदोलनाचा संध्याकाळी 5 वाजता समारोप केला जाणार होता, मात्र मुख्यमंत्री किंवा सत्ताराधाऱ्यांमधील कुणीही आंदोलनाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे आंदोलन आजही (28 नोव्हेंबर) सुरु […]

एकच जिद्द रिफायनरी रद्द, नाणारवासियांचा निर्धार
Follow us on

मुंबई : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमेवरील प्रस्तावित नाणार तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प रद्द करावा, या मागणीसाठी 17 गावातील 4 हजारहून अधिक स्थानिक नागरिकांनी मुंबईत आझाद मैदानात आंदोलन सुरु केले. कालपासून (27 नोव्हेंबर) सुरु झालेले हे आंदोलनाचा संध्याकाळी 5 वाजता समारोप केला जाणार होता, मात्र मुख्यमंत्री किंवा सत्ताराधाऱ्यांमधील कुणीही आंदोलनाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे आंदोलन आजही (28 नोव्हेंबर) सुरु ठेवण्यात येणार आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री आमची भेट घेऊन म्हणणं ऐकून घेत नाहीत, नाणार रिफायनरी प्रकल्पाचा अध्यादेश रद्द करत नाहीत, तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, असा निर्धार नाणारवासियांनी केला आहे. कुठल्याही सोयीसुविधा नसताना सुमारे 4 हजारहून अधिक नागरिक आझाद मैदानात रात्रभर आंदोलन करत असून, आजही (28 नोव्हेंबर) आंदोलन सुरु ठेवण्याची घोषणा कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेकडून करण्यात आली आहे.

कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेची भूमिका

प्रस्तावित नाणार रिफायनरी विरोधात प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ आझाद मैदानात अजूनही ठाण मांडून आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली आहे. उद्योगमंत्र्यांच्या भेटीला ग्रामस्थांनी नकार दिला आहे. पण ग्रामस्थ आंदोलकांना केवळ मुख्यमंत्र्यांचीच भेट पाहिजे आहे. कारण उच्च समितीचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडे सहा महिन्यापासून बाकी आहे.

आंदोलनाला परवानगी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच होती. पोलीस प्रशासन आंदोलकांना मैदान खाली करण्यासाठी दबाव आणत आहे,लाईटीची सोयही नाही आहे. संपूर्ण काळोखात ग्रामस्थ महिला, पुरुष बसले आहेत. लाईट लावण्यासाठी परवानगीही नाही देत आहेत. पण नाणार परिसरातील ग्रामस्थ पूर्ण जिद्दीने रात्रभर ठाण मांडून राहण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी भेट दिल्याशिवाय कोणीही मैदान खाली करणार नाही.

अध्यक्ष-अशोक वालम, कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटना

VIDEO : अशोक वालम नेमके काय म्हणाले?

कुठल्या पक्षाचा पाठिंबा?

मनसे, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, शेतकरी स्वाभिमान, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी आझाद मैदानात आलेल्या नाणारवासियांच्या आंदोलनाला समर्थन दिले आहे. मनसेचे नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, सतीश नारकर, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, काँग्रेसचे हूसँबानो खलिफे, हरीश रोग्ये, अविनाश लाड, भाई जगताप, नितेश राणे, स्वाभिमान शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर इत्यादी नेत्यांनी आझाद मैदानात जाऊन आंदोलकांच्या भेटी घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधला.

नाणार रिफायनरी प्रकल्प नेमका काय आहे?

कोकणातील निसर्गसंपन्न अशा रत्नागिरी-सिंधुदुर्गाच्या सीमेवर नाणार तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प प्रस्तावित आहे. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील 14 गावं आणि सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील 2 गावांमध्ये प्रकल्पाचा विस्तार आहे. 13000 एकरावर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. नागरिकांचा विरोध असतानाही, या गावांमधील क्षेत्र 18 मे 2017 रोजी आद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं आहे.

हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्या नाणार रिफायनरी प्रकल्प उभारत असून, त्यांची संयुक्तपणे रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल लिमिटेड म्हणजेच RRPCL कंपनी 22 सप्टेंबर 2017 रोजी स्थापन करण्यात आली.

काही महिन्यांपूर्वीच सौदी अरेबियाच्या आरामको कंपनीशी नाणार रिफायनरीबाबत करार झाला. नाणार रिफायनरीच्या उभारणीला तीन लाख कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. आशियातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प असल्याचे सांगण्यात येत असून, 2023 पर्यंत हा प्रकल्प कार्यन्वित करण्याचा सरकारचा विचार आहे.

आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पापासून अवघ्या 15-16 किलोमीटरच्या अंतरावर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे.