Share Market : भावा, आता कशाला काढतोस पळ! रातोरात व्हायचे होते ना श्रीमंत

| Updated on: Feb 25, 2023 | 8:07 PM

Share Market : नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर सक्रीय खातेदारांची संख्या अचानक रोडावली आहे. कोरोना काळात झटपट श्रीमंत होण्यासाठी आलेली नवगुंतवणूकदारांची हौस इतक्या झटक्यात फिटेल, असे बाजारालाही वाटले नसेल! शेअर बाजार हा जुगार असल्याचा भ्रम घेऊन आलेल्या पिढीने बाजारातून काढता पाय घेतला आहे.

Share Market : भावा, आता कशाला काढतोस पळ! रातोरात व्हायचे होते ना श्रीमंत
भाग भैया भाग
Follow us on

नवी दिल्ली : नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर (NSE) सक्रीय खातेदारांची (Active Investors) संख्या अचानक रोडावली आहे. कोरोना काळात झटपट श्रीमंत होण्यासाठी आलेली नवगुंतवणूकदारांची हौस इतक्या झटक्यात फिटेल, असे बाजारालाही वाटले नसेल! शेअर बाजार हा जुगार असल्याचा भ्रम घेऊन आलेल्या पिढीने बाजारातून काढता पाय घेतला आहे. शेअर बाजारात कोरोनाच्या काळात डीमॅट खात्याची संख्या (Demat Account Numbers) वाढली होती. पण नवशिक्यांचा बाजाराशी मोहभंग झाला आहे. गेल्या महिन्यात किरकोळ गुंतवणूकदारांचा वाटा 34 महिन्यांच्या नीच्चांकावर पोहचला. ॲक्टिव्ह ट्रेडर्सची संख्या सलग 8व्या महिन्यात घसरली आहे. रातोरात आपण श्रीमंत होऊ, या भाबड्या आशेवर, दिवास्वप्नावर आलेली ही पिढी फारकाळ बाजारात रमली नाही. त्यांचे पैसे पार बुडाले. नाहीतर त्यांचा संयम सुटला, हीच यामागील कारणे असण्याचा दावा करण्यात येत आहे.

एनएसईच्या (NSE) डाट्यानुसार, जानेवारीमध्ये कॅश मार्केटमधील रिटेल गुंतवणूकदारांनी दररोज बाजारात सक्रीय सहभाग घेतला. त्यांनी सरासरी 22 हजार 829 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी-विक्री केली. धक्कादायक म्हणजे हा आकडा खूप मोठा दिसत असला तरी,
मार्च 2020 नंतरचा सर्वात नीच्चांकी आहे. म्हणजे कोरोना काळात तगडा व्यवहार झाला होता.

NSE च्या डाट्यानुसार, कॅश मार्केटमध्ये गेल्या महिन्यात 10,20,626 कोटींचा व्यवहार झाला. गेल्या वर्षातील सप्टेंबर महिन्यात हाच आकडा 11,60,846 कोटी रुपये होता. तर नोव्हेंबर महिन्यातील आकडा 12,01,108 कोटी रुपयांपेक्षा कमी होता. याशिवाय, जानेवारी
2023 मध्ये सरासरी 48,601 कोटींचा व्यवहार झाला. डिसेंबरमध्ये हा आकडा 52,766 कोटी तर नोव्हेंबर 2022 मध्ये 5,71,96 कोटींचा व्यवहार झाला होता.

हे सुद्धा वाचा

बाजारातून किरकोळ गुंतवणूकदार बाहेर पडत असल्याने तज्ज्ञ आणि विश्लेषकांनी चिंता व्यक्त केली आहे. आयआयएफएल सिक्युरिटी अँड रिसर्चचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी यामागील कारण सांगितले. कोरोना काळात बाजारात मोठी घसरण आली होती. त्यामुळे लाखो गुंतवणूकदारांनी पैसा ओतला. ज्या पातळीवरुन त्यांनी शेअर खरेदी केले. तिथून ते वधारले. गुंतवणूकदारांना जोरदार परतावा मिळाला. त्यामुळे त्यांनी बाजारात मोठी गुंतवणूक केली. पण नंतर बाजारात सातत्याने त्सुनामी येत आहेत. अदानी कंपनीच्या भयंकपाचाही गुंतवणूकदारांवर मोठा परिणाम झाल्याते दिसून येत आहे.

कोरोना काळात नवशिक्यांनी बाजारात एंट्री घेतली होती. त्यांनी ट्रेडिंग आणि गुंतवणूक सुरु केली. ट्रेनिंग, युट्यूबवरील व्हिडिओ पाहून अनेकांनी पैसा ओतला. त्यांना चांगला परतावा मिळाला. त्यांना वाटले स्टॉक मार्केटमधून पैसा मिळविणे अत्यंत सोपे आहे. बाजाराच्या भाषेत, कोणीपण बाजारातून पैसा तयार करु शकतो. पण नंतर बाजाराचे झटके बसल्यावर याच गुंतवणूकदारांनी मैदान सोडले.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात निफ्टी 17464 रुपयांवर व्यापार करत होता. 24 फेब्रुवारी, 2023 रोजी बाजार 17465 रुपये स्तरावर बंद झाला. म्हणजे गेल्या 11 महिन्यात गुंतवणूकदारांना मोठा परतावा देण्यात बाजार अपयशी ठरले आहे. मात्र मुरलेल्या गुंतवणूकदारांनी बाजारातून रग्गड पैसा कमावला आहे. या सर्व घडामोडींमुळे नवशिक्यांना धक्का बसला आहे.