भारत केव्हा होणार तिसरी मोठी अर्थव्यवस्था; आता PM नरेंद्र मोदी यांनी दिली डेडलाईन

Third Largest Economy : भारताने गेल्या दहा वर्षांत जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी झेप घेतली. भारत 10 व्या क्रमांकावरुन 5 व्या क्रमांकावर आला आहे. आता भारताला तिसऱ्या अर्थव्यवस्थेची स्वप्न पडू लागली आहे. केव्हा येणार तो दिवस?

भारत केव्हा होणार तिसरी मोठी अर्थव्यवस्था; आता PM नरेंद्र मोदी यांनी दिली डेडलाईन
तिसरी मोठी अर्थव्यवस्था, पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Updated on: Jul 30, 2024 | 4:48 PM

भारत लवकरच तिसरी अर्थव्यवस्था असेल, असा दावा करण्यात येत आहे. भारताने गेल्या दहा वर्षांत मोठा पल्ला गाठला. 10 व्या क्रमांकावरुन अर्थव्यवस्था आता जगात पाचव्या स्थानावर विराजमान झाली आहे. आता तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे भारताची घौडदौड सुरु झाली आहे. पण सर्वसामान्यांना, अर्थतज्ज्ञांना भारत कधीपर्यंत तिसरी महासत्ता होईल, याची मोठी उत्सुकता आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

काय म्हणाले मोदी

जगातील गुंतवणूकदार आज भारताकडे आशेने पाहत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 2047 पर्यंत विकसीत भारताचे लक्ष्य आपण गाठणार असल्याचा दावा त्यांनी केला. म्हणजे येत्या 23 वर्षांत भारत तिसरी अर्थव्यवस्था असेल. विकसीत भारताकडे वाटचाल या विषयावर त्यांनी मत मांडले. भारतीय उद्योग परिसंघाने (CII) अर्थसंकल्पानंतर हा कार्यक्रम आयोजीत केला होता. त्याला देशातील अनेक मोठ्या उद्योजकांनी हजेरी लावली होती.

राजकीय इच्छाशक्तीची नाही कमी

परिसंघाच्या कार्यक्रमात मोदी सरकारमध्ये राजकीय इच्छाशक्तीची कमतरता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देश अगोदर या धोरणानुसार आपले सरकार निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले. सध्या देश 8 टक्क्यांच्या दराने आगेकूच करत आहे. आता तो दिवस दूर नाही, ज्यावेळी भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल. भारत आता अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपाननंतर जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचे ते म्हणाले.

याच बजेटमध्ये मोठी तरतूद

तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातच मोठी तरतूद केल्याचे त्यांनी माहिती दिली. सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या (MSME) वाढीवर त्यांनी भर दिला. त्यामुळे देशात लवकरच कोट्यवधी हातांना काम मिळेल, असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. भारतीय उद्योजक आणि उद्योगासाठी हे सुवर्ण युग आहे आणि त्यांनी ही संधी गमावता कामा नाही, हे सांगायला पण ते विसरले नाहीत.

सर्वात अगोदर देश

देशातंर्गत उद्योगांनी आता भारताला 2047 पर्यंत विकसीत राष्ट्रासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. उद्योगविश्वात जागतिक खेळाडू होण्याची मोठी संधी भारताला असल्याचे त्यांनी सांगितले. आत्मनिर्भर भारत, विकसीत भारतासाठी मोदी सरकारने उद्दिष्ट ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us