‘काळ्या मुलीशी लग्न करुन पस्तावलो’ म्हणत त्यानं बायकोला घराबाहेर काढलं आणि पुढे…

| Updated on: Oct 24, 2022 | 2:15 PM

लग्नासाठी प्रत्येक मुलाला गोरी मुलगी कुठून आणायची रे बाबा..? असा प्रश्न उपस्थित करणारी संतापजनक घटना

काळ्या मुलीशी लग्न करुन पस्तावलो म्हणत त्यानं बायकोला घराबाहेर काढलं आणि पुढे...
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: Social Media
Follow us on

‘गोराही म्हणतो गोरी पाहिजे, काळाही म्हणतो गोरी, आता तुम्हीच सांगा पाव्हणं कुठं जातील काळ्या पोरी’ हे प्रल्हाद शिंदे यांचे प्रसिद्ध गीत आजच्या युगातही तितकंच खरं ठरतंय. कारण अशीच एक घटना समोर आली आहे. लग्नाच्या 3 वर्षांनी एका पतीने आपल्या पत्नीला घरातून हाकलवून दिलं. तिचा रंग काळा (Black colour) आहे म्हणून पतीने हे संतापजनक कृत्य केल्याचा आरोप करण्यात आलाय. इतकंच नाही तर त्यानंतर त्याने एक गोरी मुलगी शोधली आणि तिच्याशी लग्न (Marriage Dispute) केलं. ही धक्कादायक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली. पश्चिम बंगालच्या (West Bengal Crime) पुरुलिया इथं उघकीस आलेल्या आलेल्या या प्रकराने सगळ्यांनाच धक्का बसलाय.

याप्रकरणी पीडित पत्नीने आपल्या पतीविरोधात लेखी तक्रारही दाखल केली. सध्या या घटनेची पोलिसांकडून अधिक चौकशी केली जाते आहे. या प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडालीय. प्रत्येक मुलाला लग्नासाठी गोरी मुलगी आणायची कुठून, असा प्रश्नही आता काहींनी उपस्थित केलाय.

भारतवर्षचे प्रतिनिधी अजय विद्यार्थी यांनी दिलेल्या वृत्तानुसार, 3 वर्षांपूर्वी एका दाम्पत्याचं लग्न झालं होतं. पण तीन वर्षांनंतर पतीला वाटलं की आपली पत्नी काळी आहे. त्यामुळे आपण तिच्यासोबत नाही राहू शकत. अखेर त्यानं दुसऱ्या एका गोऱ्या मुलीशी लग्न करुन तिला घरी आणलं आणि आपल्या पहिल्या पत्नीला घराबाहेर काढलं.

हे सुद्धा वाचा

पहिल्या लग्नावेळी घेतला हुंडा

शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दाम्पत्याच्या लग्नावेळी नवऱ्या मुलाने हुंडाही घेतला होती. सोनं-चांदी आणि 85 हजार रुपयांची रोकडही मुलीकडच्यांनी हुंड्याच्या रुपात दिले होती, असं सांगितलं जातंय. यातील पीडित पत्नीचं नाव अर्शा इलाके असं आहे, तर आरोपी पतीचं नाव राजू महतो असं आहे.

तक्रारीत काय?

पीडित पत्नीला घरातून बाहेर काढल्यानंतर तिने पोलीस स्थानक गाठलं आणि लेखी तक्रार दिली. पीडितेने आपल्या पतीसह सासरच्या सहा लोकांविरोधात तक्रार दाखल केलीय. याप्रकरणी आरोपींवर कठोरातली कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी पीडितेनं केलीय.

पीडितेचे वडील आता जिवंत नसून तिच्या माहेरच्या लोकांची आर्थिक स्थितीही चिंताजनक आहे. शिवाय माहेरी ती आपलं उरलेलं आयुष्य नाही घालवू शकत, असंही तिने म्हटलंय. लग्नानंतर पती माझ्याकडे सारखा पैशांची मागणी करत होता, असाही आरोपी पीडितेनं केलं आहे.

कामावर जाण्याचा बहाणा करुन त्याने पीडितेच्या भावांकडून पैसे घेतल्याचंही तक्रारीत म्हटलंय. दरम्यान, याप्रकरणी पतीचं नेमकं म्हणणं काय आहे, हे समोर आलेलं नाही. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. संशयित आरोपींची कसून चौकशी करुन पुढील कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी म्हटलंय.