
राज्यात सध्या गुन्ह्यांच्या घटना प्रचंड वाढल्या असून त्यामुळे कायदा-सुव्यवस्था काही उरली आहे की नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यातच आता सांगलीमध्ये एक भयानक गुन्हा घडल्याचे उघड झाले आहे. सांगलीतील सरकारी घाटावर पती-पत्नी असं एक जोडपं गप्पा मारत बसलं होतं, मात्र त्याचदरम्यान असं काही घडलं ज्यामुळे सर्वच हादरले. पत्नीशी गप्पा मारत असतानाचा पतीने टाकू काढला आणि त्याच चाकून पत्नीचा गळा चिरून तिचा निर्घृणपणे खून केला. प्रियांका चव्हाण असे या मयत महिलेचे नाव असून या खुनानंतर हल्लेखोर पतीने पलायन केले आहे. हत्येच्या या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवत पुढील तपास सुरू केला.
वाद वाढला आणि…
पती पत्नीच्या वादातून खुनाची ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रियांका जाकाप्पा चव्हाण असे मृत महिलेचे नाव असून ती सांगलीवाडी येथे राहणारी होती. तर जाकाप्पा सोमनाथ चव्हाण असे आरोपी पतीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित पती जाकाप्पा हा घटनेपूर्वी बबळेश्वर काकटगी कर्नाटक येथे रहात होता तर पत्नी प्रियांका ही सांगली वाडी येथे आपल्या आईकडे रहात होती. ती सांगलीतीलच एका साडीच्या दुकानात काम करत होती. घटनेच्या दिवशी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पती जाकाप्पा चव्हाण आणि पत्नी प्रियांका ही सरकारी घाटावर बोलत बसले होते.
यावेळी त्यांच्यात काही मुद्यावरून वाद झाला आणि त्या वादामुळे संतापलेल्या पतीने सोबत आणलेला चाकू काढून पत्नी प्रियांका हिचा गळा चिरला. या घटनेनंतर हल्लेखोर पतीने तिथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. मयत प्रियांका ही सांगलीतील एका साडी दुकानात कामाला होती तर पती कर्नाटक येथे त्याच्या गावी रहात होता. घरगुती कारणातून हा पतीने पत्नीचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोखर, उपअधीक्षक विमला एम, पोलिस निरीक्षक संजय मोरे, मुकुंद कुलकर्णी यांच्यासह पोलिसानी धाव घेतली. घटनेनंतर बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी झाली होती