भाजप आमदाराचा पोलीस कर्मचाऱ्यावर तीन लाखांची खंडणीचा आरोप, पोलीस ठाण्यात पोहचत सरळ…

भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव पोलीस ठाण्यात ठिय्या सुरु केला आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने तीन लाखांची लाच मागितली असल्याचा आरोप आमदारांनी केला आहे. त्या पोलिसावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार चव्हाण यांनी केली आहे.

भाजप आमदाराचा पोलीस कर्मचाऱ्यावर तीन लाखांची खंडणीचा आरोप, पोलीस ठाण्यात पोहचत सरळ...
चाळीसगाव पोलीस ठाण्यात बसलेले आमदार मंगेश चव्हाण.
Jitendra Zavar | Updated on: May 19, 2025 | 2:08 PM

जळगाव जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यावर खंडणी घेतल्याचा आरोप झाला आहे. एका गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने तीन लाख रुपये मागितले. तडजोडीनंतर एक लाख रुपये घेतले, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे. त्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्याच्या मागणीसाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या सुरु केला आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलीस ठाणे सोडणार नाही, असा पवित्रा आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतला आहे.

जळगावच्या चाळीसगाव शहर पोलिसांवर भाजप आमदार मंगेश चव्हाण गंभीर आरोप केले आहे. एका गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी एका तरुणांकडून पोलीस कर्मचाऱ्यांनी 3 लाख रुपयांची खंडणी मागितली, असा आरोप मंगेश चव्हाण यांनी केला आहे. त्यानंतर तडजोडीनंतर पोलिसांनी एक लाख रुपये घेतल्याचा आरोप मंगेश चव्हाण यांनी केला आहे. यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यासमोर बसून आमदारांनी पैसे देणाऱ्या युवकाशी संवाद साधला. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्याने कारवाई करण्याचे आश्वासन आमदार मंगेश चव्हाण यांना दिले. परंतु जोपर्यंत खंडणी घेणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलीस स्टेशनची पायरी उतरणार नाही, असा पवित्रच मंगेश चव्हाण यांनी घेतला आहे.

खंडणीखोर पोलिसांवर गुन्हा दाखल करून अटक करा, अशी मागणी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी करत पोलीस ठाण्यात ठिय्या सुरु केला आहे. आमदार मंगेश चव्हाण हे चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तळ ठोकून बसले आहेत. यावेळी पोलीस अधिकाऱ्याशी संवाद साधताना आमदार चव्हाण म्हणाले, आताच्या आता त्या पोलीस कर्मचाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करा, त्याला अटक करा. पोलीस ठाण्याजवळ अनेक अवैध व्यवसाय सुरु आहे. त्यासंदर्भात कारवाई का होत नाही? असा प्रश्नही आमदार चव्हाण यांनी विचारला.

काही दिवसांपूर्वी आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात असल्याचा आरोप करत पंचायत समितीत कर्मचाऱ्यांना जाब विचारला होता. लाभार्थी शेतकऱ्यांनी पंचायत समितीचे कर्मचारी विहिरीचे अनुदान मंजूर करताना वीस ते तीस हजार रुपयांची मागणी करतात, अशी तक्रार आमदार चव्हाण यांच्याकडे आली होती. त्यानंतर पंचायत समिती गाठत दोन दिवसांत कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

 

Follow Us