
Jalgaon Suicide News : अल्पवयीन मुलं कधी काय करतील हे याचा नेम नाही. आजकालच्या मुलांना तणाव सहन होत नाहीये. ती शीग्रॅकोपी झाली आहेत. थोडंजरी रागवलं तर आजकालची मुलं टोकाचा निर्णय घ्यायला मागेपुढे पाहात नाहीत. दरम्यान, जळगावमध्ये त्याचीच प्रचिती देणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्री घरी यायला उशीर का झाला? असं रागात विचारल्यामुळे एका 16 वर्षांच्या मुलीने थेट जीवन संपवलं आहे. मुलीच्या या धक्कादायक कृत्यामुळे एकच खळबळ उडाली असून अख्खं कुटुंब सुन्न झालं आहे.
जळगावातील खेडी गावात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. घरी उशिरा आल्याच्या कारणावरून वडिलांनी रागावल्याने व किरकोळ मारहाण केल्याने संतापाच्या भरात मुलीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ही अल्पवयीन मुलगी रात्री 8 वाजता घरी परतली होती. घरात आल्यानंतर वडिलांनी तिला एवढ्या उशिरा का आली? अस विचारलं. तसेच किरकोळ मारहाण करत तिला रागावले. याचाच राग या अल्पवयीन मुलीला आला. त्यानंतर कुणाला काहीही न सांगता ती थेट घरातून निघून गेली. घरापासून 500 मीटर अंतरावर असलेल्या विहिरीत तिने उडी घेऊन आत्महत्या केली.
ही घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुलीने कसलाही विचार न करता थेट जीवन संपवल्यामुळे दु:ख व्यक्त केलं जातंय. तर मृत मुलीपश्चात तिच्या घरी आई, वडील, दोन बहिणी आणि दोन भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर मुलांनी ताणतणाव सहन करण्यासाठी तसेच त्यातून मार्ग करण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मुलं तणावात दिसत असली किंवा त्यांच्याकडून काही चुका झाल्यास रागात न येता मुलांना समजावून सांगावे, असे आवाहन करण्यात येत आहे.