30 वर्षांच्या विवाहितेसह चार लहान मुलांची अमानुष हत्या, शेजारच्या घरालाही कळलं नाही, रात्रीच्या अंधारात असं काय घडलं?

| Updated on: Feb 07, 2022 | 12:21 PM

मयत 30 वर्षीय लक्ष्मी गृहिणी होती. तिचा दहा वर्षांचा मुलगा, सात वर्षांची मुलगी, चार वर्षांचा मुलगा आणि आठ वर्षांचा भाचा अशा एकूण पाच जणांची हत्या करण्यात आली. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून ही हत्या कोणी केली, हे सुद्धा समजलेलं नाही

30 वर्षांच्या विवाहितेसह चार लहान मुलांची अमानुष हत्या, शेजारच्या घरालाही कळलं नाही, रात्रीच्या अंधारात असं काय घडलं?
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

बंगळुरु : विवाहिता आणि चार लहान मुलांची एकाच घरात हत्या (Murder) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कर्नाटकातील (Karnataka) कृष्णराजसागर परिसरात हा प्रकार घडला आहे. 30 वर्षीय महिलेसह तिची तीन मुलं आणि भाचा अशा चार चिमुरड्यांना जीवे ठार मारण्यात आलं. महिलेच्या राहत्या घरीच हे हत्याकांड घडले आहे. महिलेसह चारही मुलांना चाकूने भोसकल्याचं (Knife Attack) उघड झालं आहे. रविवारी सकाळी हा प्रकार समोर आला. बराच वेळ कोणीही दरवाजा न उघडल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. प्लॅस्टिक वस्तू विक्रेत्याच्या पत्नी आणि मुलांची राहत्या घरात निर्घृण हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अधिक तपास सुरु केला आहे.

राजस्थानचं कुटुंब कर्नाटकात

मयत 30 वर्षीय लक्ष्मी गृहिणी होती. तिचा दहा वर्षांचा मुलगा, सात वर्षांची मुलगी, चार वर्षांचा मुलगा आणि आठ वर्षांचा भाचा अशा एकूण पाच जणांची हत्या करण्यात आली. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून ही हत्या कोणी केली, हे सुद्धा समजलेलं नाही. हे कुटुंब मूळ राजस्थानचं असून कामानिमित्त कर्नाटकात स्थायिक झालं होतं.

पाचही जणांवर सपासप वार

पोलिसांनी सांगितले की पाचही जणांवर अनेक वेळा वार करण्यात आले होते. प्रत्येक जण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. मारेकर्‍यांनी घरातून काही मौल्यवान वस्तू घेतल्याचे दिसून येत आहे, परंतु ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली की आणखी काही हेतू होता याचा तपास पोलिसांना करत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

शेजाऱ्यांनाही जाग आली नाही

शनिवारी रात्री लक्ष्मीचा पती घरी नव्हता. पोलिस शेजाऱ्यांची चौकशी करत आहेत. पाच जणांची निर्घृण हत्या होत असताना शेजाऱ्यांपैकी एकालाही कोणाचा आवाज कसा ऐकू आला नाही, याचे पोलिसांना आश्चर्य वाटत आहे.

“आम्ही अद्याप हे खून चोरीच्या उद्देशाने झाल्याची पुष्टी करु शकलेलो नाही. लहान मुलांची इतक्या निर्दयीपणे हत्या करण्यात आली असल्याने, यामागे एखादा मजबूत हेतू असू शकतो.आम्ही सत्य शोधून काढू आणि आरोपींना अटक करु” असं आश्वासन पोलिसांनी दिलं.

या घटनेने केआरएसमधील रहिवाशांना मोठा धक्का बसला आहे. शेजारच्या महिलांनी शोकाकुल अवस्थेत पोलिस अधिकाऱ्यांकडे गुन्हेगारांना पकडण्याची मागणी केली.

संबंधित बातम्या :

वडिलांमुळे आईने आत्महत्या केल्याचा राग, औरंगाबादेत 24 वर्षीय मुलाकडून बापाची हत्या

लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर आयुषमानची झोया, चारित्र्याच्या संशयातून बॉयफ्रेण्डकडूनच हत्या

चार महिने भावासोबत राहिली, तीन दिवसांपूर्वीच सासरी परतली, पतीकडून विवाहितेची निर्घृण हत्या