
मुंबईवरून मंगळुरूला जाणाऱ्या एका बसमधून पोलीसांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत केली आहे. पोलीसांनी उत्तर कन्नड जिल्ह्यातील भटकळमधून 401 ग्रॅम वजनाच्या 32 सोन्याच्या बांगड्या आणि 50 लाख रूपयांची रोकड पकडली आहे. वाहनांच्या तपासणीदरम्यान ही रक्कम आणि सोने जप्त करण्यात आले आहे. आता या प्रकरणी भटकळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.
या घटनेच्या तपासादरम्यान पोलीसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. बसच्या चालकाने सांगितले की, ही बॅग त्याला एका अनोळखी व्यक्तीने दिली होती. बॅग देताना त्या व्यक्तीने चालकाला सांगितले होते की, मी बस नंबर सांगतो, त्यानंतर आमचे लोक ही बॅग घ्यायला येतील. बॅग घेणाऱ्या व्यक्तीचे नाव इरफान असेल.’
भटकळमध्ये पोलीस वाहनांची तपासणी करत होते. ही बस तिथे पोहचताच या बसची तपासणी करण्यात आली. यावेळी पोलीसांना सुटकेसमध्ये मिठाईच्या पेट्यांसारखे पॅक केलेले बॉक्स आढळले. ज्यावेळी पोलीसांनी या पेट्या उघडल्या तेव्हा त्यात रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने आढळले. त्यानंतर पोलीसांनी हा सर्व मद्देमाल जप्त केला असून या मालमत्तेचा खरा मालक कोण आहे याचा शोध सुरु केला आहे.
कारवार तालुक्यातील मांगिनी परिसरात पोलीसांनी लाखो रुपयांची गोवा दारू जप्त केली. ही दारू आरोपी तस्कर डोक्यावर पोत्यात भरून जंगलात घेऊन जात होते. या प्रकरणात कारवारमधील चितकुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मुख्य रस्त्यावर पोलीस तपासणी करतात, त्यामुळे हे लोक सायंकाळच्या वेळी दारूचे बॉक्स जंगलातून घेऊन जात होते.
चितकुलचे पीएसआय परशुराम आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केला आहे. या कारवाईत दिलीप म्हाळसेकर, राजेंद्र पडवळकर आणि गणपती गलगुटकर यांना अटक करण्यात आली. हे सर्वजण कारवारचे रहिवासी आहेत. या तिघे 1 लाख 34 हजार 482 रूपये किमतीची दहापेक्षा जास्त ब्रँडच्या गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करत होते. आता त्यांना ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपासणी सुरु आहे.