पोलिसाची फोनवरुन धमकी, भीतीपोटी तरुणाची विषारी गोळ्या खाऊन आत्महत्या

| Updated on: Oct 05, 2021 | 3:50 PM

रवी अहिरवारविरुद्ध एका तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसांनी रवीला फोन करुन पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. यामुळे तो घाबरला आणि शनिवारी त्याने सागर-बिना रोडवर किशनपुराजवळ सल्फासच्या गोळ्या खाल्ल्या

पोलिसाची फोनवरुन धमकी, भीतीपोटी तरुणाची विषारी गोळ्या खाऊन आत्महत्या
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

इंदौर : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात एका युवकाने विषारी गोळ्या खाऊन आत्महत्या केली. नारायवली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जरुआखेडा गावात हा प्रकार घडला आहे. खोटी तक्रार दाखल करुन पोलिसांनी धमकावल्यामुळे भीतीपोटी तरुणाने हे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. मृत तरुणाचे नाव रवी अहिरवार असून तो पाली गावचा रहिवासी होता.

काय आहे प्रकरण?

रवी अहिरवारविरुद्ध एका तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसांनी रवीला फोन करुन पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. यामुळे तो घाबरला आणि शनिवारी त्याने सागर-बिना रोडवर किशनपुराजवळ सल्फासच्या गोळ्या खाल्ल्या. त्याला रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडलेले पाहून लोकांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर त्याला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले, परंतु त्याची गंभीर स्थिती पाहता त्याला बुंदेलखंड वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. मात्र आज (मंगळवारी) सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अंत्यसंस्कार

युवकाचा मृतदेह गावात नेण्यात आला, तेव्हा कोणतीही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ नये किंवा कुठलीही अनुचित घटना घडू नये, याची काळजी घेण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस दल तैनात करण्यात आले होते. यावेळी एसडीएम पवन बरिया, अतिरिक्त एसपी विक्रम सिंह कुशवाह, रहाटगड, खुराई एसडीओपी उपस्थित होते. प्रशासनाच्या कडेकोट बंदोबस्तात रवीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्थानिक आमदार प्रदीप लारिया यांनी रवी अहिरवारच्या नातेवाईकांना तातडीने 30 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. सद्य: स्थितीत संबंधित एसएचओच्या (ठाणेदार) विरोधात पोलीस विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही, पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ठाणेदाराने आरोप फेटाळले

रवीच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की गावातील इंदर अहिरवार यांनी आमच्याविरोधात खोटी तक्रार दाखल केली आहे. ज्यासाठी ठाणेदाराने रवीला फोन करुन धमकी दिली आणि पोलीस चौकीवर येण्यास सांगितले. ज्याच्या भीतीतून त्याने आत्महत्या केली. तर ठाणेदाराने आपल्यावर आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे.

संबंधित बातम्या :

लहान मुलांच्या भांडणाचे कारण, पिंपरीतील उच्चभ्रू वसाहतीत भाडोत्री गुंडांना बोलावून शेजाऱ्यांना मारहाण

बॉसची बोलणी खाऊन मस्तकात आग, घरी जाऊन मित्रांच्या डोक्यात बॅट घातली, दुहेरी हत्येनंतर म्हणतो…

बेपत्ता चिमुकल्याचा मृतदेह घरामागे आढळला, अंगावर हळद-कुंकू, कोल्हापुरात नरबळी?