पती-पत्नी, बाप-लेक आणि सख्खे भाऊ, अहमदनगरमध्ये एकाच दिवशी पाण्यात बुडून सहा जणांचा मृत्यू

| Updated on: Oct 06, 2021 | 8:47 AM

पाण्यात बुडून एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यापैकी दोघा जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर चौघांचा शोध सुरु आहे.

पती-पत्नी, बाप-लेक आणि सख्खे भाऊ, अहमदनगरमध्ये एकाच दिवशी पाण्यात बुडून सहा जणांचा मृत्यू
अहमदनगरमध्ये तीन घटनांमध्ये सहा जणांचा बुडून मृत्यू
Follow us on

शिर्डी : पाण्यात बुडून एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना अहमदनगर जिल्ह्यात उघडकीस आल्या आहेत. तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा जणांना प्राण गमवावे लागले आहेत. पती-पत्नी, बाप-लेक आणि सख्ख्या भावांचा यामध्ये समावेश आहे.

कुठे काय घडलं

पाण्यात बुडून एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यापैकी दोघा जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर चौघांचा शोध सुरु आहे. श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथे मासेमारी ‌करणाऱ्या दाम्पत्याचा मृत्यू झाला. ओढ्यातील पाण्यात बुडून पती-पत्नीला प्राण गमवावे लागले.

दुसरीकडे, कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूरजवळील गांजावाडी येथील नाल्यात बुडून बाप-लेकाचा जीव गेला. तर राहुरीजवळील गणपती घाट येथे मुळा नदी पात्रात बुडाल्यामुळे दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला.

नाशकात चार दिवसात बुडून चौघांचा मृत्यू

दरम्यान, नाशिकमधल्या रामकुंड परिसरात चार दिवसांत चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे. गोदावरी नदी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्यात उतरुन धोका पत्करू नये, असे आवाहन पोलिस आणि प्रशासनाने केले आहे.

नाशिक जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गोदावरी नदीला चारदा पूर आला. जिल्ह्यातील सर्व धरणे भरली आहेत. त्यामुळे धरणांवर पोलिस बंदोबस्त तैनात करून या परिसरात नागरिकांना फिरकण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. मात्र, नाशिक शहरातील रामकुंड परिसरात अनेक भाविक दर्शनासाठी येतात. त्यात गेल्या चार दिवसांत पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पाय घसरून पडल्याने चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

देवदर्शनाला गेलेला तरुण बुडाला

पहिली घटना रामकुंडाजवळच्या गांधी तलावात घडली. यात उत्तम नगरमधल्या गणेश कॉलनीतले महाजन कुटुंब देवदर्शनासाठी आले होते. या कुटुंबातील रावसाहेब महाजन (वय 36) यांचा पाय घसरला आणि ते गोदापात्रात कोसळले. त्यांना शोधण्यासाठी जीवरक्षक जवानांनी खूप प्रयत्न केले. मात्र, पाण्याची पातळी जास्त असल्याने त्यांना अपयश आले. खूप उशिराने त्यांचा मृतदेह हाती लागला. रावसाहेब यांच्या मागे पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे.

दुसऱ्या घटनेत पाण्यात पडलेले रावसाहेब महाजन यांचा शोध घेताना जीवरक्षक जवानांना एक मृतदेह आढळला. पोलिसांनी याप्रकरणी तपास केला असता, तो ओवेस नदीम खान या अवघ्या अठरा वर्षांच्या तरुणाचा असल्याचे समजले. तिसऱ्या घटनेत साहील सलीम अन्सारी या अवघ्या बारा वर्षांच्या मुलाचा गोदापात्रात बुडून मृत्यू झाला. तो नाशिकमधल्या बुधवार पेठेत रहायचा. साहील हा घरात कोणालाही न सांगता गोदापात्रावर अंघोळीला गेल्या असल्याचे समजते. त्यात पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

यापूर्वी तिघे बुडाले

नाशिकमध्ये यापूर्वी पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यात नांदगावमध्ये पांझण नदीच्या पुलावरून नीलेश परदेशी (वय 31) हा तरुण वाहून गेला आहे. दिंडोरीतील गणेश गुंबाडे (वय 22) या तरुणाचा पालखेडच्या कालव्यात बुडून मृत्यू झाला आहे. शेतातल्या टोमॅटोवर फवारणी केल्यानंतर गणेश अंघोळीसाठी कालव्यात उतरला होता. कालव्यातून बाहेर निघताना लोखंडी रॉडचा धक्का लागल्याने तो पुन्हा कालव्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाला.

संबंधित बातम्या :

गोदावरीत उतराल तर जीवास मुकाल; रामकुंड परिसरात 4 दिवसांत 4 बुडाले

एकमेकांचा हात धरुन चौघे तलावात आंघोळीला उतरले, गटांगळ्या खाताना मदतीसाठी आरडाओरड, पण…