मुलाचा हव्यास, पंढरपुरात पत्नीसह दोन मुलींना तब्बल दीड वर्ष डांबून ठेवलं
मुलगा होत नाही म्हणून स्वतःच्या पत्नीसह दोन मुलींना एका घरात डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवऱ्याने मुलाच्या आशेने हे कृत्य केलं.
रवी लव्हेकर, पंढरपूर : मुलगा होत नाही म्हणून स्वतःच्या पत्नीसह दोन मुलींना एका घरात डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवऱ्याने मुलाच्या आशेने हे कृत्य केलं. डांबून ठेवलेल्या पीडित महिलेसह तिच्या दोन्ही मुलींची सुटका करण्यात आली आहे. निर्भया पथकाच्या पुढाकाराने त्यांना मुक्त करण्यात आलं. याप्रकरणी निर्दयी पतीविरोधात पंढरपूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुलगा होत नाही म्हणून आरोपी पतीने झेंडे गल्लीतील एका घरात दीड वर्षापूर्वी पत्नीसह दोन मुलींना डांबून ठेवले होते. यादरम्यान आरोपी पतीने आपल्या पत्नी आणि मुलींचा शारिरीक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप आहे.
या घटनेची येथील निर्भया पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाने कारवाई करत पीडित महिलेसह तिच्या दोन मुलींची सुटका केली.
नेमकं प्रकरण काय?
आरोपी पतीला मुलाचा हव्यास होता. मात्र या दाम्पत्याला दोन मुलीच आहेत. मुलाच्या हव्यासापोटी आरोपीने त्याची पत्नी आणि दोन्ही मुलींना तब्बल दीड वर्ष डांबून ठेवलं. पंढरपुरातील झेंडे गल्लीतील एका घरात या तिघींनाही डांबून ठेवलं होतं. या निर्दयी बापाने पत्नीचा तर छळ केलाच, पण मुलांनाही मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे.
तब्बल दीड वर्षांनी सुटका
सुदैवाने तब्बल दीड वर्षाने का होईन याची कुणकुण लागली. निर्भया पथकाने तातडीने या प्रकरणाची दखल घेत, पीडितांची सुटका केली. तसंच आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र तब्बल दीड वर्ष एखाद्या कोठडीत राहिल्याप्रमाणे दिवस कसे काढले असतील, याची आपण केवळ कल्पनाच करु शकतो.