इम्रान मेहंदीला हर्सूलच्या अंडा सेलमधून बाहेर काढा, Aurangabad खंडपीठाचे आदेश, काय आहे नेमकं प्रकरण?

| Updated on: Jan 29, 2022 | 1:23 PM

अॅड. जैस्वाल म्हणाले की, कारागृहात गुन्हा केला तरच अंडा सेलमध्ये ठेवले जाते. तेही 14 दिवसांसाठी मात्र मेहंदीला दोन वर्षे, चार महिने ठेवले. त्यामुळे कैद्याचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. यामुळे संवैधानिक हनन होत असल्याचे त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.

इम्रान मेहंदीला हर्सूलच्या अंडा सेलमधून बाहेर काढा, Aurangabad खंडपीठाचे आदेश, काय आहे नेमकं प्रकरण?
कैद्याला 14 दिवसांपेक्षा जास्त काळ एकांतात ठेवता येत नाही
Follow us on

औरंगाबादः सुपारी किलर अशी कुख्याती असलेला आरोपी इम्रान शेख (Imran Shaikh) नासेर शेख ऊर्फ इम्रान मेहंदी हा सध्या औरंगाबादमधील हर्सूल कारागृहातील अंडा सेलमध्ये आहे. मात्र त्याचे मानसिक संतुलन बिघडत असल्याने त्याला तत्काळ अंडा सेलमधून हलवावे, असे आदेश मुंबई उच्च (Mumbai High court) न्यायायलयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad bench) दिले आहेत. अंडा सेलमध्ये त्याचे मानसिक संतुलन बिघडत असल्याने त्याला तत्काळ हलवावे, अशी याचिका इम्रान याच्या पत्नीने केली होती. त्यावर खंडपीठाचे न्या. व्ही.के. जाधव, न्या. संदीपकुमार मोरे यांनी जेल प्रशासनाला हे आदेश दिले आहेत.

कोण आहे सुपारी किलर इम्रान मेहंदी?

औरंगाबादमधील माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांचे 4 मार्च 2012 रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास आसेफिया कॉलनीतून अपहरण झाले होते. या प्रकरणी 11 मार्च 2012 रोजी इम्रान मेहंदीसह सात जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी जाहीर केले होते. या अटकेसाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या प्रकरणात नाव न येऊ देण्याचे इम्रान मेहंदीने अनेक प्रयत्न केले. मात्र ते अपयशी ठरले. अपहरणानंतर सलीम कुरेशी यांची हत्याही करण्यात आली होती. पोलिसांच्या चौकशीनंतर इम्रान मेहंदी याने गुन्ह्याची कबुली दिली होती तसेच यासह आधी केलेल्या खुनांचीही माहिती दिली होती.
या आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. 28 ऑगस्ट 2012 रोजी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला होता.

इम्रान मेहंदीची अंडासेलबाबत काय तक्रार?

इम्रान मेहंदीच्या पत्नीने केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, मेहंदीने 15 सप्टेंबर 2021 रोजी कारागृह अधीक्षकांना अर्ज करून अंडा सेलमध्ये माझे मानसिक संतुलन बिघडले असून मला यातून बाहेर काढावे, अशी विनंती केली होती. मात्र त्यावर काही कारवाई झाली नाही. त्यामुळे पत्नी रुहिना हिने खंडपीठात धाव घेतली. आर्थिक अडचणींमुळे विधी सेवा प्राधिकरणाकडे अर्ज करून वकील देण्याची मागणी केली. त्यावर विधी सेवा प्राधिकरणाने अॅड. रुपेश जैस्वाल यांची नियुक्ती केली. अॅड. जैस्वाल म्हणाले की, कारागृहात गुन्हा केला तरच अंडा सेलमध्ये ठेवले जाते. तेही 14 दिवसांसाठी मात्र मेहंदीला दोन वर्षे, चार महिने ठेवले. त्यामुळे कैद्याचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. यामुळे संवैधानिक हनन होत असल्याचे त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.

खंडपीठाचे काय निर्देश?

औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी तीन डॉक्टरांचे पथक नेमावे. या पथकाने कैद्याची वैद्यकीय तपासणी करून त्याचा अहवाल सोमवारी 31 जानेवारी रोजी सादर करावा, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.
तसेच कैदी इम्रान मेहंदीची भेट घेऊन त्याचा जबाब नोंदवण्याचे आणि फोटोग्राफरला सोबत नेऊन अंडा सेलचे फोटो काढून त्याचा अहवाल सोमवारी सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने जिल्हा न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना दिले आहेत.

इतर बातम्या- 

शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केल्याप्रकरणी स्वतंत्र भारत पक्षाची सरकारसह वीज कंपनीला नोटीस, काय आहे प्रकरण?

Khan Sir : RRB NTPC निकालाविरोधात विद्यार्थ्यांचं हिसंक आंदोलन, खान सरांवर एफआयर दाखल, नेमकं कारण काय?