Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्या पीएलाही जामीन मंजूर, लवकरच तुरुंगातून सुटका होणार

| Updated on: Jan 25, 2023 | 9:39 PM

अनिल देशमुख हे संजीव पलांडे यांच्या माध्यमातून पैसे घेत होते, असा आरोप आहे. या प्रकरणात संजीव पालांडे यांना दीड वर्षानंतर जामीन मिळाला आहे. पालांडे यांना ईडीच्या प्रकरणात आधीच जामीन मिळालेला असल्यानं तुरुंगातून बाहेर येण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्या पीएलाही जामीन मंजूर, लवकरच तुरुंगातून सुटका होणार
अनिल देशमुख
Follow us on

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खाजगी स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांनाही मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने पालांडे यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे पालांडे यांची लवकरच तुरुंगातून सुटका होणार आहे. सीबीआयने 100 कोटी कथित भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर केल्याप्रकरणात गुन्हा नोंदवला होता. मात्र या प्रकरणात आज मुंबई उच्च न्यायालयाने संजीव पालांडे यांना जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने पालांडे यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. मात्र सत्र न्यायल्याच्या निर्णयाला पालांडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

दीड वर्षानंतर पालांडे तुरुंगातून बाहेर येणार

संजीव पालांडे यांना ईडीने दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात याआधीच जामीन मिळालेला आहे. मात्र आता सीबीआय प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पालांडे यांना जामीन मंजूर केला आहे. 100 कोटी वसुली प्रकरणात संजीव पलांडे यांना अटक करण्यात आली होती. संजीव पालांडे हे तब्बल दीड वर्षानंतर तुरुंगातून बाहेर येणार आहेत.

एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

आज संजीव पालांडे यांना जामीन मंजूर करताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांनी काही विशेष अटी आणि शर्थींवर जामीन मंजूर केला आहे. पालांडे यांना 1 लाखाच्या जातमुचलक्यावर सोडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

तसेच पालांडे यांना पासपोर्ट कोर्टात जमा करण्याचे, तपास एजन्सीच्या कार्यालयात हजेरी लावणे असे निर्देश देखील न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणातील कुठल्याही साक्षीदाराला भेटणे, त्यांच्याशी संवाद साधू नये किंवा पुराव्यांशी छेडछाड करू नये अशा अनेक अटी न्यायालयाने जामीन देताना घातल्या आहेत.

देशमुख प्रकरणात संजीव पलांडे कसे अडकले?

अँटेलिया स्फोटक प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी सचिन वाझेला अटक झाल्यानंतर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली होती. बदली करण्यात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप केला होता.

अनिल देशमुखांनी पोलिसांना मुंबईतील बार, पब मालकांकडून पैसे गोळा करायला सांगितले, असा आरोप परमबीर सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला होता. त्याचबरोबर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी पैसे घेतल्याचंही पत्रात म्हटलेलं होतं. या प्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.

तसेच मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. याच प्रकरणात ईडीने अनिल देशमुखांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि खासगी स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना अटक केली होती.

देशमुख पालांडे यांच्या माध्यमातून पैसे घेत असल्याचा आरोप

अनिल देशमुख हे संजीव पालांडे यांच्या माध्यमातून पैसे घेत होते, असा आरोप आहे. या प्रकरणात संजीव पालांडे यांना दीड वर्षानंतर जामीन मिळाला आहे. पालांडे यांना ईडीच्या प्रकरणात आधीच जामीन मिळालेला असल्यानं तुरुंगातून बाहेर येण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.