पैशांच्या हव्यासापायी मालकाचीच निर्घृण हत्या, घराजवळ पुरलं, नंतर खंडणीची मागणी, ठाणे हादरलं

| Updated on: Sep 12, 2021 | 4:32 PM

ठाण्यातील व्यासायिक मनसुख हिरेन, भरत जैन यांच्या हत्येनंतर आणखी एका व्यवसायिकाच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तीनही हत्येच्या घटना वेगवेगळ्या असल्या तरी व्यापारी वर्गात दहशतीचं वातावरण आहे.

पैशांच्या हव्यासापायी मालकाचीच निर्घृण हत्या, घराजवळ पुरलं, नंतर खंडणीची मागणी, ठाणे हादरलं
Follow us on

ठाणे : ठाण्यातील व्यासायिक मनसुख हिरेन, भरत जैन यांच्या हत्येनंतर आणखी एका व्यावसायिकाच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तीनही हत्येच्या घटना वेगवेगळ्या असल्या तरी व्यापारी वर्गात दहशतीचं वातावरण आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास थेट उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेल्या स्फोटक प्रकरणाशी संबंधित आहे. त्याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. तर भरत जैन यांची हत्या त्यांच्या ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा टाकण्याच्या उद्देशातून झाल्याचं उघडकीस आलं होतं. या दोन भयानक घटना ताज्या असताना ठाण्यातील तिसरी घटना देखील तितकीच खतरनाक आणि भयावह आहे. विशेष म्हणजे नोकरांनी पैशांच्या हव्यासापायी मालकालाच अशाप्रकारे संपविल्याने आता नेमका विश्वास कुणावर ठेवाव? हा सवाल उपस्थित होतोय.

नेमकं प्रकरण काय?

ठाण्याचे व्यावसायिक हणमंत शेळके हे 1 सप्टेंबरला बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या कुटुंबियांनी 1 सप्टेंबरला कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली होती. या दरम्यान आरोपींनी शेळके यांच्या कुटुंबियांना फोन करत खंडणीची मागणी केली. शेळके यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. विशेष म्हणजे आरोपी हे शेळके यांच्याच मोबाईलवरुन फोन करत होते. त्यामुळे त्यांचा शोध लागणं कठीण झालं होतं. पण आरोपींचा जेव्हा दुसऱ्यांदा फोन आला तेव्हा पोलीस सतर्क झाले. त्यांनी तांत्रिक आधारावर तपास करत तीन आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यानंतर आरोपींनी सर्व गुन्हा कबूल करत पोलिसांना आपल्या कृत्यांची माहिती दिली.

अपहरण करत त्याच दिवशी शेळके यांची हत्या

पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींनी मृतक हणमंत शेळके यांचं अपहरण केलं. त्याच दिवशी त्यांनी शेळके यांची अमानुषपणे हत्या केली. आरोपींनी शेळके यांचं मृत शरीर खोलीच्या मागेच चार फुट खोल खड्ड्यात मोकळ्या जागेत पुरलं. त्यानंतर शेळके यांच्याच मोबाईलवरुन फोन करत खंडणीची मागणी केली. घाबरेल्ल्या कुटुंबियांनी पोलिसांना हा सगळा प्रकार सांगितला.

आरोपी शेळके यांच्याकडे मजुरीचे काम करायचे

पोलिसांनी मोबाईल ट्रेस करुन आठ दिवसात आरोपींचा छडा लावला. हे सर्व आरोपी परप्रांतीय आहेत. त्यांच्यातील तिघेजण पळून गेले आहेत. तर आरोपी शिवा वर्मा आणि सुरज वर्मा हे पोलिसांच्या हाती लागले आहेत. ते हेमंत शेळके यांच्याकडे मजुरीचे कामं करत होते. पैशांच्या हव्यासापायी त्यांनी शेळके यांचे अपहरण करुन हत्या केली.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्चला सापडला होता. त्यानंतर या प्रकरणी बऱ्याच घडामोडी घडल्या. मनसुख हिरेन हे हिरे व्यापारी होते. त्यांचा रेतीबंदर परिसरात मृतदेह सापडल्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. विशेष म्हणजे या प्रकरणाचा तपास थेट मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांशी संबंधित असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे एटीएस आणि त्यानंतर एनआयए यांच्याद्वारे या प्रकरणाचा तपास सुरु होता. तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा अद्यापही तपास सुरुच आहे. हे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. ही घटना ताजी असताना ठाण्याच्या आणखी एका व्यापाऱ्याचा मृतदेह रेतीबंदर परिसरात आढळल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

अमरावतीत पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 7 वर्षीय चिमुकलीवर 20 वर्षीय युवकाचा बलात्कार

80 वर्षीय आजींचा मृतदेह गटारीत कुजलेल्या अवस्थेत, धुळ्यात एकच खळबळ