Nashik| नाशिकमधल्या मखमलाबाद कालव्यात तीन मुले बुडाली!

| Updated on: Dec 28, 2021 | 4:09 PM

नाशिकमध्ये खेळायला बाहेर गेलेली मुले पोहण्यासाठी कालव्यात उतरली, पण त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे तिघेही पाण्यात बुडाली.

Nashik| नाशिकमधल्या मखमलाबाद कालव्यात तीन मुले बुडाली!
नाशिकमध्ये मखमलाबाद परिसरातील समर्थनगर कालव्यात तीन मुले बुडाली.
Follow us on

नाशिकः नाशिकमधील मखमलाबाद रोड परिसरातल्या समर्थनगर येथील कालव्यात तीन लहान मुले बुडाल्याची घटना आज मंगळवारी घडली आहे. कालव्यातल्या पाण्याचा वेग जास्त होता. त्यामुळे पाण्याच्या खोलीचा मुलांना अंदाज आला नाही. त्यामुळे ती बुडाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने धाव घेत या मुलांना कालव्याबाहेर काढले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले.

अशी घडली घटना

नाशिकमधील मखमलाबाद रोड परिसरात समर्थनगर येथे एक कालवा आहे. या ठिकाणी अनेक मुले खेळायला जातात. आज मंगळवारी गजवक्रनगर भागात असलेल्या नामको कॅन्सर हॉस्पिटलमागे राहणारी तीन मुले या ठिकाणी खेळण्यासाठी गेले होते. मात्र, कालव्यात पाणी सोडण्यात आले होते. ही खेळायला गेलेली मुले पोहण्यासाठी कालव्यात उतरली, पण पाण्याचा वेग जास्त असल्याने त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे तिघेही पाण्यात बुडाली. नीलेश मुळे, प्रमोद जाधव आणि सिद्धू धोत्रे अशी तिघांची नावे आहेत. जीवरक्षक दलाच्या जवानांनी तिघांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने त्यांना यश आले नाही. या मुलांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस अधिक तपास करत आहेत.

महिन्यातील दुसरी घटना

पाण्यात बुडून मुलांचा मृत्यू झाल्याची ही महिन्यातील दुसरी घटना आहे. याच महिन्यात मित्रांसोबत खेळायला बाहेर पडलेल्या 8 वर्षांच्या मुलाचा खाणीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आयान रफिक शेख असे या मृत मुलाचे नाव आहे. अंबड औद्योगिक वसाहतीजवळ चुंचाळे परिसरातील घरकुल योजनेजवळ अनेक खाणी आहेत. यंदा पावसाने चक्क डिसेंबर महिन्यातही हजेरी लावली. त्यामुळे या खाणीमध्ये पाणी साचले आहे. अनेक मुले या परिसरात दररोज खेळायला येतात. चुंचाळे, घरकुल येथे राहणारा आयान रफिक शेख (वय 8) हा तिघा भावंडासोबत या दगडी खाणीजवळच्या पाण्यात खेळायला गेला होता. मात्र, खेळताना त्याचा पाय घसरला. तो खाणीच्या पाण्यात पडून बुडाला. त्यानंतर आज ही दुसरी घटना घडली आहे.

मुलांवर लक्ष ठेवा

पालकांनी आपले मूल खेळायला कुठे जात आहे, यावर जरूर लक्ष ठेवावे. शक्यतो मुलांना घराबाहेर खेळायला पाठवताना एकट्याला पाठवू नये. त्याच्यासोबत कोणीतरी ज्येष्ठ व्यक्ती असावीच. पाणी साचलेले मोठे खड्डे, खाण, विहीर, तलाव इत्यादी ठिकाणी मुलांना खेळायला एक तरी पाठवू नये. पाठवले तर त्यांच्यासोबत घरातीलच कोणीतरी व्यक्ती असावी. अन्यथा मुले पाणी कमी आहे म्हणून पाण्यात उतरतात. अनेकदा मुलांचा पाय घसरतो. असे काहीही होऊ शकते. त्यामुळे पुढची दुर्घटना टाळण्यासाठी पालकांनी दक्ष राहण्याची गरज आहे.

इतर बातम्याः

ST Strike|विलीनीकरण नसेल, तर मरण द्या; नाशिकमधील 269 एसटी कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

महाविकास आघाडीचे किती आमदार नाराज?; बावनकुळेंनी आकडाच सांगितला