Nagpur Crime : गर्दीच्या ठिकाणाहून चोरायचे वाहन अन् दुसऱ्या शहरात कमी किमतीत विकायचे… त्या चोरट्यांना पोलिसांनी कसं पकडलं ?

मास्टर किल्लीचा वापर करून ते बाईकचे कुलूप उघडायचे आणि बाईक घेऊन सरळ मध्य प्रदेश कडे रवाना व्हायचे. मात्र पोलिसांनी सापळा रचत या भामट्यांच्या मुसक्या आवळल्याने अनेक गुन्हे उघड होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे

Nagpur Crime : गर्दीच्या ठिकाणाहून चोरायचे वाहन अन् दुसऱ्या शहरात कमी किमतीत विकायचे... त्या चोरट्यांना पोलिसांनी कसं पकडलं  ?
| Edited By: | Updated on: Sep 07, 2023 | 3:19 PM

नागपूर | 7 सप्टेंबर 2023 : शहरातील गर्दीच्या ठिकाणावरून दुचाकी वाहन चोरीला (bike theft) जाण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर शहरातील वाडी पोलिसांनी बाईक चोराच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या कडून तब्बल 31 बाईक्स (31 bikes) जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, नागपूर शहरातून चोरलेल्या या बाईक्स, ते चोरटे मध्यप्रदेशात नेऊन तेथे अत्यंत कमी किमतीत विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे…

असा रचला सापळा

नागपुरातील वाडीसह आठवडी बाजारासारख्या गर्दीच्या अनेक ठिकाणांवरून बाईक्स आणि कार अशी वाहनं चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलं होतं. हे लक्षात येताच वाडी पोलीसांचं पथक गेल्या २ महिन्यापासुन सातत्याने बाईक चोरांच्या मागावर होते. हे चोरटे बाईक्स चोरून त्या मध्य प्रदेशमध्ये नेत असल्याचे माहिती पोलिसांना समजली. तसेच हे आरोपी मध्यप्रदेशातील सिवनी येथे स्वःताचे अस्तितव लपवुन राहत आहे अशी खात्रीपूर्वक माहिती मिळाल्यानंतर एक पथक सिवनी येथे दाखल झाले.

तेथे दोन दिवस सापळा रचत ते चोरांचा शोध घेत होते. तांत्रिक माहिती व खबरींच्या मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी हे मानेगाव या त्यांच्या मूळगावात असल्याचे समजले. त्यावरुन सापळा रचण्यात आला होता. यातील मुख्य आरोपी, शैलेंद्र सुरजप्रसाद नायक हा तिथे येताच पोलिसांनी
त्याला अटक केली. त्याची चौकशी केली तेव्हा त्याने त्याचे आणखी दोन साथीदार, राजेश छत्रपाल भलावी आणि मनेश उर्फ बंटी राजकुमार बिसेन (पवार) यांचीही नावे उघड केली. त्यावरून पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. वाडी पोलिसांनी त्यांच्याकडून आत्तापर्यंत एकुण 31 मोटर सायकल व एक कार देखील जप्त केली आहे. आरोपींची कसून चौकशी सुरू असून आणखी ईतर गुन्हे उघडकिस होण्याची दाट शक्यता आहे.

चोरटे हे मास्टर किल्लीचा वापर करून बाईकचे कुलूप उघडायचे आणि बाईक घेऊन सरळ मध्य प्रदेश कडे रवाना व्हायचे, अशी माहिती पोलिसांनी दिली.