पुणे: आजची सकाळ पुणेकरांसाठी अत्यंत धक्कादायक आणि हादरवून टाकणारी ठरली. एकाच कुटुंबातील सात जणांची हत्या झाली. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचं वाटत होतं. पोलिसांनीही तसा दावा केला होता. पण नंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात या प्रकरणाचं सत्य बाहेर आणलं. त्या रक्तरंजित नदीत सात लोकांनी आत्महत्या केली नाही तर त्यांची हत्या करण्यात आली. घरच्याच भेदीने हे कृष्णकृत्य केलं. चुलत भावानेच जुन्या वैरातून सात जणांची हत्या घडवून आणली आणि आत्महत्येचा बनाव केला.
पुण्याच्या दौंड तालुक्यातील भीमा नदीत एक आठवड्यापूर्वी एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आले होते. पोलिसांनी सुरुवातीला तपास करून ही आत्महत्या असल्याचं सांगितलं. या कुटुंबातील मुलीचे गावातील मुलाशी प्रेम होते. त्यामुळे दोघेही गायब झाले होते. त्यामुळेच या कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केली असल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं.
परंतु पोलिसांनी जसजसा या प्रकरणाचा खोलवर तपास केला. तस तसं त्यांना नवी माहिती मिळाली. या सात जणांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाल्याचं पोलिसांनी आढळून आलं. पराकोटीच्या द्वेषामुळे ही हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. चुलत भावानेच या सातही हत्या केल्याचं तपासात उघड झालं.
या हत्या घडवून आणणाऱ्या चुलत भावाला काल रात्री पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासोबत एका महिलेलाही अटक करणअयात आली आहे. काही ओळखीच्या लोकांनी आणि नातेवाईकांनी आधी या सात जणांना काही तरी खायला दिलं. त्यामुळे हे सातजण बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना बेशुद्धावस्थेतच नदीत फेकून देण्यात आल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.
या सातही मृतांच्या अंगावर मार लागल्याच्या कोणत्याच जखमा नव्हत्या. त्यामुळे पोलीस फॉरेन्सिक रिपोर्टची वाट पाहत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत सहा लोकांना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी अजूनही फरार आहे.
पुण्यातील यवत गावाच्या बाहेरच्या परिसरात भीमा नदीवर परगाव पूलाजवळ सोमवारी 4 आणि मंगळवारी 3 जणांचे मृतदेह सापडले होते. सर्व मृतदेह एकमेकांच्या 200 ते 300 मीटरच्या अंतरावर सापडले होते. मोहन पवार, पत्नी संगिता मोहन पवार, मुलगी राणी फलवरे, जावई श्याम पंडित फलवरे आदी मृतांची नावे आहेत. मृतांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे.