सोन्याच्या हव्यासापोटी मित्रानेच अपहरण करत संपवले, धक्कादायक घटनेने सांस्कृतिक शहर हादरले

| Updated on: Nov 01, 2022 | 5:46 PM

आरोपीने खून केल्यानंतर मृतदेह पोत्यात भरून पुणे-सातारा महामार्गवरील सारोळे येथील नीरा नदीपात्रात टाकल्याचं तपासात निष्पन्न झालंय. स्थानिक रेस्क्यू टीमच्या मदतीने नीरा नदीत मृतदेहचा शोध घेण्यात येत आहे.

सोन्याच्या हव्यासापोटी मित्रानेच अपहरण करत संपवले, धक्कादायक घटनेने सांस्कृतिक शहर हादरले
तब्बल 19 दिवसांनी सापडला वास्तुशास्त्र सल्लागाराचा मृतदेह
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे : वास्तुशास्त्र सल्लागाराचे अपहरण करून, दागिन्यांच्या मोहापोटी त्याच्याच मित्राने खून केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात उघडकीस आली आहे. आरोपीने खून केल्यानंतर मृतदेह पोत्यात भरून पुणे-सातारा महामार्गवरील सारोळे येथील नीरा नदीपात्रात टाकल्याचं तपासात निष्पन्न झालंय. स्थानिक रेस्क्यू टीमच्या मदतीने नीरा नदीत मृतदेहचा शोध घेण्यात येत आहे. मात्र अद्याप मृतदेह शोधण्यास यश आलेलं नाही. निलेश वरघडे असं हत्या झालेल्या वास्तुशास्त्र सल्लागाराचं नाव आहे.

याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. दिपक नरळे आणि रणजित जगदाळे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून 19 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

आरोपींनी पूजेसाठी सोबत नेले

निलेश वरघडे हे वास्तुशास्त्र सल्लागार होते. निलेश वरडे यांना 16 ऑक्टोबर रोजी मित्र दिपक नरळे याने पुण्यातील नऱ्हे येथे एका औषध दुकानात पूजेसाठी नेले होते. मात्र निलेश यांच्या अंगावरील दागिने पहिल्यानंतर दिपकने त्यांना लुटण्याचा डाव रचला.

आधी बेशुद्ध केले मग हत्या केली

यासाठी आरोपी दिपक आणि त्याचा साथीदार रणजित यांनी निलेश यांना कॉफीतून गुंगीचे औषध दिले. ते बेशुद्ध पडल्यानंतर गळा दाबून त्यांची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी निलेश यांचा मृतदेह पोत्यात भरून पुणे-सातारा महामार्गावरच्या नीरा नदीत टाकून दिला.

मिसिंगच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शोध सुरु केला

दरम्यान निलेश हे घरी परत न आल्याने त्यांच्या पत्नी रुपाली वरघडे यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग असल्याची तक्रार दिली. त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवत आरोपी दिपक याला ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने हत्या केल्याची कबुली दिली.

आरोपींकडून लुटलेला मुद्देमाल हस्तगत

आरोपींनी खूनाची कबुली दिल्यानंतर गेल्या 9 दिवसांपासून निलेश यांच्या मृतदेहाचा शोध स्थानिक रेस्क्यू टीममार्फत नीरा नदीत घेण्यातं येतोय. मात्र अद्याप मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमला यश आलेलं नाही. पोलिसांनी आरोपींकडून मोटार, दोन दुचाकी, सोन्याचे दागिने, मोबाईल असा एकूण 19 लाख 16 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.