गणपती दर्शनाला जाताना अपघात, उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून पुण्यात बाईकस्वारांचा मृत्यू

| Updated on: Sep 16, 2021 | 4:20 PM

पुण्याच्या कर्वेनगर येथील उड्डाणपुलाच्या कठड्याला दुचाकीची धडक बसल्याने अपघात होऊन वारजे भागातील दोन तरुणांना प्राण गमवावे लागले आहेत. शंकर इंगळे आणि सलील ईस्माईल कोकरे अशी तरुणांची नावं आहेत.

गणपती दर्शनाला जाताना अपघात, उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून पुण्यात बाईकस्वारांचा मृत्यू
पुण्यातील कर्वेनगर उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी काहीशी कमी झाली आहे.
Follow us on

पुणे : दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी रात्रीच्या वेळी बाईकने निघालेल्या तरुणांना पुण्यात अपघात झाला. कर्वेनगर भागातील उड्डाणपुलाच्या कठड्याला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दोघाही बाईकस्वार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून ऐन गणेशोत्सवात कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

पुण्याच्या कर्वेनगर येथील उड्डाणपुलाच्या कठड्याला दुचाकीची धडक बसल्याने अपघात होऊन वारजे भागातील दोन तरुणांना प्राण गमवावे लागले आहेत. शंकर इंगळे (वय 27 वर्ष) आणि सलील ईस्माईल कोकरे (वय 20 वर्ष, दोघे रा. वाराणसी सोसायटी, वारजे माळवाडी) अशी मयत तरुणांची नावं आहेत. बुधवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

शंकर इंगळे आणि सलील कोकरे हे घरच्या गणपतीची आरती करुन रात्री उशिरा पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी बाईकवरुन निघाले होते. रस्त्यावर गर्दी नसल्याने ते भरधाव वेगाने कर्वेनगर उड्डाणपुलावरुन जात होते. त्यावेळी पुलावरील वळणावर चालकाचे बाईकवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची दुचाकी पुलाच्या डाव्या बाजूला जाऊन धडकली.

दोघांच्या चेहर्‍याचाही चेंदामेंदा

अपघाताच्या जोरदार आवाजामुळे जवळच असलेल्या पोलीस चौकीतील कर्मचारी धावत घटनास्थळी पोहचले. परंतु, ही धडक इतकी भीषण होती, की दोघांच्या चेहर्‍याचाही चेंदामेंदा झाला होता. पोलीस येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

सलील कोकरे महाविद्यालयीन शिक्षण घेत होता तर, शंकर इंगळे हा पाण्याचा टँकर पुरवण्याचा व्यवसाय करत होता. दोघांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

औरंगाबादेत आयशर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

दुसरीकडे, औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड शहराजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन तरुणांना जागेवरच आपला जीव गमवावा लागला आहे. औरंगाबाद सिल्लोड महामार्गावर भरधाव जाणाऱ्या आयशर ट्रकने एका दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दोन्ही तरुणांचे जागेवरच प्राण गेले. अपघातानंतर आयशर ट्रक चालक फरार झाला आहे. मयत दोन्ही तरुण सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ या गावातील रहिवासी आहेत.

अंबरनाथमध्ये कुटुंबातील तिघांवर काळाचा घाला

अंबरनाथमध्ये 12 सप्टेंबरला संध्याकाळी रिक्षा आणि कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात चौघा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांपैकी तिघे एकाच कुटुंबातील सदस्य होते.

संबंधित बातम्या :

CCTV VIDEO | अस्थी विसर्जनानंतर परतणाऱ्या कुटुंबाला अपघात, टेम्पोला अर्टिगाची जोरदार धडक

आबांच्या पत्नीमुळे अपघातग्रस्तांचे प्राण वाचले, आमदार सुमनताई पाटलांची मदतीसाठी तत्परता

अंबरनाथमध्ये रिक्षा आणि कारचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू