
पुणे बलात्कार प्रकरणाचा आरोपी अद्यापही फरार आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी काल 8 पथके तयार केली होती. आता ही संख्या 15 झाली आहे. तसेच आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी फरार घोषित केलं आहे. त्याची माहिती देणाऱ्यांना एक लाख रुपये बक्षीसही दिलं जाणार आहे. राज्याचे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनीही या प्रकरणाची दखल घेत घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी पुणे पोलिसांकडून प्रकरणाची माहिती घेतली. यावेळी योगेश कदम यांनी आरोपीचं लोकेशन ट्रॅक झाल्याचं स्पष्ट केलं.
गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी पोलिसांकडून प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. या घटनेची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात आरोपीला आयडेंटिफाय केलं. त्याला ट्रॅक करायला सुरुवात केली आहे. त्याचं लोकेशन सापडेल, तसं त्याला फॉलो केलं जात आहे. मी या प्रकरणाची डिटेल्स देणार नाही. कारण आपण आरोपीला शोधत आहोत. त्याचं संभाव्य लोकेशन ट्रक झालं आहे, असं योगेश कदम म्हणाले.
आरोपीचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आठ टीम तयार केल्या आहेत. आरोपीला लवकर पकडलं जाईल. घटना परवा पहाटे 6 वाजता घडली. पोलिसांनी या घटनेची माहिती कालपर्यंत का कळवली नाही? माहिती का दिली नाही? असा गैरसमज केला जात आहे. पण यात काही तथ्य नाही. फिर्याद आल्यावर आरोपीला अर्ध्या तासात आरोपीला आयडेंटिफाय करण्यात आलं. आरोपी अलर्ट होऊ नये म्हणून दक्षता घेतली गेली. म्हणून ही बातमी बाहेर येऊ दिली नाही. बातमी बाहेर आली असती तर संभाव्य लोकेशन मिळालं नसतं. आरोपी पळाला असता. घटना लपवली नाही. गुप्तता पाळली. कारण ती गरजेची होती. आरोपी लवकर पकडला जाईल, असं त्यांनी सांगितलं.
घटना घडली तेव्हा तिथे कुठलाही प्रतिकार झाला नाही. फोर्स झाला नाही. आरडाओरड झाली नाही. त्यामुळे कुणाला ते कळलं नाही. आरोपी ताब्यात येईल तेव्हा माहिती मिळेल. घटना पहाटे 6 वाजता घडली. फिर्याद सकाळी 9 वाजता आली. मध्ये तीन तास गेले. जोपर्यंत फिर्याद येत नाही तोपर्यंत पकडणार कसं. फिर्याद आल्यावर अर्ध्या तासात त्याला आयडेंटिफाय केलं आहे. त्याने बसने प्रवास केला आहे. तेही ट्रॅक केलंय, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पुण्यातील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पुण्यात सीसीटीव्हीचं सर्व्हिलन्स कडक करणार आहोत. त्यासाठी 437 कोटींचा प्रकल्प मंजूर केला आहे. फेशियल रेकग्निशन असलेले सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. म्हणजे आरोपी आला तर पोलिसांना अलर्ट येईल. पोलीस अलर्ट होतील आणि घटनास्थळी पोहोचतील. तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आरोपीला पकडणार आहोत. यापुढे एआयच्या तंत्रज्ञानाने आरोपींना पकडणार आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.