आधी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा खोटा दाखल केला, मग गुन्हा मागे घेण्यासाठी पैशांची मागणी, अखेर तरुणाने…

सांगलीत गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. नुकत्याच घडलेल्या एका भयंकर घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

आधी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा खोटा दाखल केला, मग गुन्हा मागे घेण्यासाठी पैशांची मागणी, अखेर तरुणाने...
सांगलीत ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाने जीवन संपवले
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jul 03, 2023 | 3:07 PM

सांगली : सांगलीत एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. खोट्या गुन्ह्यातून सोडवण्यासाठी पैशाचा तगादा लावल्याने एका तरुणाने नैराश्येतून जीवन संपवल्याची घटना सांगलीत घडली आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर जवळ ही घटना घडली. महेश सुभाष जाधव असे 25 वर्षीय पीडित तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर ग्रामस्थांनी विटा पोलीस ठाण्यासमोर मृतदेह ठेवत आरोपींवर गुन्हा दाखल करत तात्काळ अटकेची मागणी केली. यानंतर विटा पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सरपंच अंकुश नामदेव ठोंबरे, उपसरपंच सागर जाधव, धर्मराज जाधव, दादासाहेब दुशारेकर, महेंद्र मोहिते आणि नितीन खुडे या सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला. यातील सरपंच अंकुश ठोंबरे याला पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपींनी महेश जाधव याच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा खोटा गुन्हा दाखल केला होता. यानंतर हा गुन्हा मागे घेण्यासाठी त्यांनी तरुणाकडे 5 लाखांची मागणी केली. पैसे दिले नाहीत तर ‘तुझे लग्न होणार नाही, तुला न्यायालयात बघून घेतो’, अशी धमकी देत होते. यामुळे तरुण नैराश्येत राहत होता. याच नैराश्येतून त्याने जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. महेश भाऊ केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत आहे.

ही घटना उघड होताच नातेवाईक आणि ग्रामस्थ संतापले. राजकीय हेतूने आरोपींनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप नातेवाईक आणि ग्रामस्थांनी केला आहे. यानंतर तरुणाचा मृतदेह विटा पोलीस ठाण्यासमोर ठेवत नातेवाईक आणि ग्रामस्थांनी ठिय्या मांडला. आरोपींवर गुन्हा दाखल करा आणि तात्काळ कारवाई करा, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत, एकाला अटक केली आहे. यानंतर गावकरी शांत झाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us