मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी! सख्ख्या भावांच्या मृत्यूने माढा तालुका हळहळला
राज्यातील अपघाताचं सत्र, गेल्या 24 तासांत झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात 10 जणांनी गमावला जीव
संदीप शिंदे, प्रतिनिधी, TV9 मराठी, माढा : सोलापूरमधील माढा तालुक्यात भीषण अपघात (Madha Accident) झाला. या अपघाताने दोघा सख्ख्या भावांचा जीव घेतलाय. दळण घेऊन दोघे भाऊ घरी परतत होते. दुचाकीवरुन (Solapur Bike Accident) ते घरी जाण्यासाठी निघाले होते. पण वाटेत एक भरधाव वाहन काळ बनून आलं. अज्ञात वाहनानं त्यांच्या दुचाकीचा धडक दिली. या अपघातात दोघेही भाऊ गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण मृत्यूशी सुरु असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. दोघाही भावांचा उपचारादरम्यान मृत्यू (Accident Death) झाला.
माढा तालुक्यातील सुर्ली येथून शिराळा (टें) इथं दोघे भाऊ निघाले होते. दळण घेऊन ते घरी जात असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनानं धडक दिली. या धडकेत चिरडले गेल्यानं दोघेही भाऊ गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
विठ्ठल अतुल कदम आणि रणजीत अतुल कदम अशी दोघा सख्ख्या भावांची नावं आहेत. अपघातानंतर दोघांची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनी त्यांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांनी शर्थ केली. पण अखेर उपचारादरम्यान, या दोन्ही भावांचा मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जातेय.
पाहा लाईव्ह घडामोडी : Video
विठ्ठल अतुल कदम हा 16 वर्षांचा होता. तर त्याचा लहान भाऊ रणजीत अतुल कदमचं वय 14 वर्ष होतं. सख्ख्या भावांचा अपघाती मृत्यू संपूर्ण माढा तालुक्याच्या काळजाला चटका लावून गेलाय. घरातील तरुण मुलांच्या अपघाती मृत्यूने कदम कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे.
राज्यातील रस्ते अपघातांचं सत्रही सुरुच असल्याचं यानिमित्तानं पाहायला मिळालंय. शनिवारी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातही सख्ख्या भावांसह तिघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. थांबलेल्या स्कूल बसला मागून धडक दिल्यानं हा अपघात घडला होता. या अपघातामध्ये दीपक कल्याण पवार, वय 20 आणि भागवत पवार, वय 22 या दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. तर सुनिल शिंदे, वय 25 याच्यावरही काळानं घाला घातला.
दरम्यान, शनिवारी रात्री नांदेडमध्येही भीषण अपघात झाला. ट्रक आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक होऊन पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर चौघे गंभीर जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांच्या चालकांचा जागीच जीव गेला होता. तर अन्य तिघे जणही ठार झाले होते. गेल्या 24 तासांतील झालेल्या अपघातात 10 जणांचा जीव गेलाय. त्यामुळे रस्ते अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनत असल्याचं अधोरेखित झालंय.