मृत्यूनंतर 18 महिने केले नाही अंत्यसंस्कार; मृतदेह घरी ठेवला, पण का..?
विमलेश दीक्षित असे मृत्यू झालेल्या आयकर अधिकाऱ्याचे नाव आहे. विमलेश यांचा एप्रिल 2021 मध्येच मृत्यू झाला होता. त्यावेळी मोती रुग्णालयाने मृत्यू प्रमाणपत्रही जारी केले होते.
कानपूर : उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती उजेडात आली आहे. रावतपूर येथील एक कुटुंब दीड वर्षांपासून मृतदेहा (Deadbody)सोबत राहत होते. आपला माणूस जिवंतच आहे, असा समज करून कुटुंबीय त्याच्यासोबत राहिले. मात्र 18 महिन्यांनंतर त्याचा आधीच मृत्यू (Death) झाल्याचे उघड होताच सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मृत व्यक्ती गुजरातच्या आयकर (Income Tax) विभागात अधिकारी होता.
रुग्णालयाने जारी केले मृत्यू प्रमाणपत्र
विमलेश दीक्षित असे मृत्यू झालेल्या आयकर अधिकाऱ्याचे नाव आहे. विमलेश यांचा एप्रिल 2021 मध्येच मृत्यू झाला होता. त्यावेळी मोती रुग्णालयाने मृत्यू प्रमाणपत्रही जारी केले होते.
मात्र विमलेश हे जिवंतच आहेत, असा विश्वास बाळगून कुटुंबीयांनी त्यांच्यावर घरगुती उपचार सुरु ठेवले होते. याच कारणावरून त्यांनी 18 महिने उलटूनही मृतदेहावर अंत्यसंस्कार केले नाहीत. कुटुंबीयांनी मृतदेह घरीच ठेवला होता.
आयकर विभागाने चौकशी केली आणि सत्य उजेडात आले!
विमलेश दीक्षित हे गुजरातच्या आयकर विभागात कार्यरत होते. दीड वर्षे ते ड्युटीवर रुजू झाले नाहीत म्हणून गुजरात आयकर विभागाने कानपूरच्या सीएमओला चौकशी करण्यास सांगितले होते.
त्यानुसार रावतपूर येथील आरोग्य विभागाचे पथक विमलेश दीक्षित यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी कुटुंबीयांनी विमलेश यांची वैद्यकीय तपासणी करण्यापासून रोखले. यादरम्यान पोलिसांनी विमलेश यांचे घर गाठले आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यावेळी विमलेश यांच्या मृत्यूचे सत्य उजेडात आले.
विमलेश कोमात गेल्याचे कारण दिले जात होते!
विमलेश यांच्या कुटुंबीयांनी दीड वर्षांपासून मृतदेह घरी ठेवला. त्यांच्या घरी येणाऱ्या पाहुणे मंडळींना विमलेश हे आजारी असून कोमात आहेत, असे सांगितले जायचे.
शुक्रवारी आरोग्य विभागाचे पथक पोहोचले, तेव्हा विमलेश यांचे संपूर्ण शरीर काळवंडले असल्याचे आढळले. आयकर विभागाने विमलेश यांच्या सततच्या गैरहजरीमुळे चौकशी सुरु केली, तेव्हा हे संपूर्ण प्रकरण समोर आले.
कुटुंबीय घेत होते विमलेशचा पगार
विमलेश यांची दीड वर्षे कार्यालयात गैरहजेरी लागली होती. मात्र या काळात त्यांचे कुटुंबीय विमलेश यांच्या सेवेसाठी मिळणारा पगार घेत होते. ते पगार घेत होते, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता.
त्यामुळे आयकर विभागाने संपूर्ण प्रकाराची वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात धक्कादायक सत्याचा उलगडा झाला आहे. या घटनेने सर्वांनाच चक्रावून टाकले आहे.