बँकेतून काढलेले दोन लाख रुपये दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी पळवले; नाशिकमधली भर दुपारची घटना

| Updated on: Oct 27, 2021 | 5:52 PM

बँकेतून दोन लाखांची काढलेली रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नाशिकमधील शालिमार भागात घडली आहे. या दिवसाढवळ्या झालेल्या चोरीने नागरिकांमध्ये भीती आहे.

बँकेतून काढलेले दोन लाख रुपये दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी पळवले; नाशिकमधली भर दुपारची घटना
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः बँकेतून दोन लाखांची काढलेली रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नाशिकमधील शालिमार भागात घडली आहे. या दिवसाढवळ्या झालेल्या चोरीने नागरिकांमध्ये भीती आहे.

याप्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, रेहाना रफिक शेख (वय 55, रा. शिवाजीरोड, शालिमार) या आपल्या पतीसह बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पैसे काढण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी दुपारी दीडच्या सुमारास जवळपास दोन लाखांची रक्कम बँकेतून काढली. त्यांनी हे पैसे आपल्याजवळच्या पिशवीत ठेवले. दोघेही बँकेतून बाहेर पडताच मोटारसायकलवर आलेले चोरटे रेहाना यांच्या हातातील पैशाची पिशवी हिसकावून पसार झाले. शेख दाम्पत्याने चोर, चोर अशी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत चोरटे बेपत्ता झाले होते. याप्रकरणी रेहाना शेख यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विभागीय आयुक्तांच्या बंगल्यात चोरी

नाशिकमध्ये चक्क विभागीय आयुक्तांच्या कडेकोट चोवीस तास बंदोबस्त असलेल्या सरकारी बंगल्यात चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे. त्यांचा रुतबा काही औरच. त्यांच्या बंगल्यालाही चोवीस तास खडा पहारा असतो. आता याच बंगल्यात चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोल आला आहे. गमे यांच्या बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड चोरट्यांनी कापून नेले आहे. चोवीस तास कडेकोट बंदोबस्त असताना देखील चोरट्यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आपले काम साध्य केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. यापूर्वी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्या देखील बंगल्याचा आवारात चोऱ्या झाल्या आहेत. याबाबत सर्व गुन्हे दाखल असताना एकही चोर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे यावेळी देखील चोर सापडतो की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

येवल्यात 7 ठिकाणी घरफोड्या

येवला शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून, त्यांनी तब्बल 7 ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर येवला शहरात रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पटेल कॉलनी, आनंद नगर, मोरे वस्ती या कॉलनी भागात 7 ठिकाणी चोरी करत धुमाकूळ घातला आहे. यात 5 ठिकाणी बंद घरांच्या दरवाज्याचे कुलूप तोडत चोरी केली, तर परिसरातील राधाकृष्ण मंदिरातील दानपेटीतील रक्कम देखील चोरून नेली आहे. त्याचप्रमाणे आनंदनगर भागातील गणपती मंदिराची दानपेटी फोडत चोरट्यांनी त्यातील रक्कम देखील लंपास केली आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर चोरीच्या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले असून, पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरवासीय करीत आहेत.

इतर बातम्याः

कृषिमंत्र्यांच्या मतदार संघातील अनुदान वाटपात घोळ; चौकशी समितीचा अहवाल दाबण्याचा प्रयत्न, ठपका ठेवलेल्या दोषींवर कारवाईस टाळाटाळ

परमबीर सिंह बेनामी मालमत्ता प्रकरण; पुनमियाला चार आठवड्यांचा दिलासा, अटक टाळण्यासाठी धडपड