अंगणात खेळणारे बहीण-भाऊ अचानक गायब, बऱ्याच शोधाशोधीनंतर संध्याकाळी सापडले, पण..

| Updated on: Jun 10, 2021 | 9:32 PM

तासगाव तालुक्यातील आरवडे येथे घराच्या मागे असणाऱ्या शेततळ्यात पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे (Two children die after falling into farm ponds in Sangli).

अंगणात खेळणारे बहीण-भाऊ अचानक गायब, बऱ्याच शोधाशोधीनंतर संध्याकाळी सापडले, पण..
तासगाव तालुक्यातील आरवडेत शेततळ्यात पडून 2 बालकांचा मृत्यू
Follow us on

सांगली : तासगाव तालुक्यातील आरवडे येथे घराच्या मागे असणाऱ्या शेततळ्यात पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे (Two children die after falling into farm ponds in Sangli). शौर्य संजय मस्के ( वय-6 वर्षे) आणि ऐश्वर्या आप्पासो आवटी (वय-8 वर्षे) अशी मृतक बालकांची नावं आहेत. संबंधित घटना बुधवारी (9 जून) सायंकाळी घडली. घटनास्थळी कुटुंबियांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. दोन्ही बालकांचा शोध आसपासच्या घरामध्ये घेऊन सुद्धा ते सापडत नव्हती. त्यामुळे ती कोठे गेली असतील याची चिंता कुटुंबियांना वाटत होती. कुटुंबातील सदस्य यांनी याबाबत शेततळ्याकडे जाऊन शोध घेतला असता तळ्यावर मोबाईल दिसला त्यानंतर पाण्यात उड्या टाकून दोघांना बाहेर काढले. पण तोपर्यंत खूप उशिर झाला होता.

नेमकं प्रकरण काय?

आरवडे-गोटेवाडी रोडलगत असणाऱ्या मस्के वस्ती येथे आपल्या घराबाहेर शौर्य आणि ऐश्वर्या नेहमीप्रमाणे खेळत होती. सायंकाळी 3 च्या दरम्यान दोघेही दिसेनात म्हणून कुटुंबियांनी आसपासच्या घरामध्ये शोधायला सुरुवात केली. मात्र ते दोघे सापडले नाहीत. त्यानंतर घरामागे असणाऱ्या शेततळ्याकडे शोधायला गेले असता शेततळ्यावर मोबाईल दिसला. यावेळी परिसरातील तरुणांनी बालकं पाण्यामध्ये घसरून पडल्याचा अंदाज व्यक्त करत पाण्यात उड्या टाकल्या. त्यानंतर तरुणांना शेततळ्याच्या तळभागात दोघे सापडले (Two children die after falling into farm ponds in Sangli).

रुग्णालयात डॉक्टरांकडून मृत घोषित

चिमुकल्यांना तातडीने पाण्याबाहेर काढून तासगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत खूप उशिर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यापैकी ऐश्वर्या ही माधवनगर येथील नातेवाईकांच्या घरातून आरवडे येथे काही दिवसांपूर्वी आली होती. घटनास्थळी कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावणार होता. शौर्य हा आई-वडिलांना एकुलता एक होता तर ऐश्वर्या हिला 2 लहान भाऊ आहेत.

कुटुंबातील सदस्यांना मानसिक धक्का

घडलेल्या घटनेमुळे कुटुंबातील सदस्यांना मानसिक धक्का बसला. अनेकांना त्रास होत होता. आरोग्य विभागाचे डॉ. रोहित जाधव, गणेश करांडे हे या घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत थांबून उपचार करीत होते. तर सतर्कता म्हणून रुग्णवाहिका पाचारण करण्यात आल्या होत्या.

दोन दिवसांपूर्वीच तीन भावंड पाण्यात बुडाली

विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच आटपाडी तालुक्यातील जाभूळणी घानंद येथे मासेमारी करत असताना ओढ्याच्या पाण्यात पडून 2 सख्या आणि 1 चुलत अशा 3 भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आणखी एक घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा : उल्हासनगरातील मंदिरातून देवांच्या मूर्ती आणि दागिन्यांची चोरी, अवघ्या 4 तासात चोरीचा छडा