लग्न मंडपात जल्लोषात गोळीबार, पोटात गोळी लागून भाजप पदाधिकाऱ्याच्या भावाचा मृत्यू

उत्सवी गोळीबारात तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि चौकशीला सुरुवात केली. गोळीबार करण्यात आलेला विवाह मंडप हा भाजपचे माझवानचे आमदार सुचिस्मिता मौर्य आणि त्यांच्या कुटुंबाचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

लग्न मंडपात जल्लोषात गोळीबार, पोटात गोळी लागून भाजप पदाधिकाऱ्याच्या भावाचा मृत्यू
लग्नातील गोळीबारात तरुणाचा मृत्यू
| Edited By: Anish Bendre | Updated on: Nov 22, 2021 | 3:45 PM

लखनौ : उत्तर प्रदेशात मिरवणुकीतील गोळीबार काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. जल्लोषात केल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या गोळीबारात आतापर्यंत अनेक वऱ्हाडींना जीव गमवावा लागला आहे. मिर्झापूर येथील भाजप आमदाराच्या लग्न मंडपात झालेल्या गोळीबारात नुकतंच भाजप पदाधिकाऱ्याच्याच भावाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

कटरा कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरजू उद्यान मॅरेज हॉलमध्ये ही घटना घडली आहे. आशिष गुप्ता हा अमरदीप सिंह यांच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी गेला होता. लग्नाच्या जल्लोषात रात्री उशिरा लग्नमंडपात गोळ्या झाडण्यात आल्या. यापैकी एक गोळी आशिषच्या पोटात लागली. यानंतर लग्नमंडपात एकच खळबळ उडाली.

रुग्णालयातून अन्यत्र नेताना मृत्यू

जखमी आशिषला जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र त्याची गंभीर प्रकृती पाहता त्याला वाराणसी ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले, परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

विवाह मंडप भाजप आमदाराचा

उत्सवी गोळीबारामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि चौकशीला सुरुवात केली. गोळीबार करण्यात आलेला विवाह मंडप भाजपचे माझवानचे आमदार सुचिस्मिता मौर्य आणि त्यांच्या कुटुंबाचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

मृत युवक भाजप पदाधिकाऱ्याचा भाऊ

मृत युवक आशिष गुप्ता हा भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याचा भाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे. मुलीच्या बाजूची मंडळी जौनपूरहून आली होती, तर नवरदेव अमरदीप सिंह हा ब्लॉक प्रमुख अवधराज सिंह पप्पू यांच्या कुटुंबातील आहे. लग्नाला अनेक जण बंदूक घेऊन आले होते. जल्लोषादरम्यानच ही घटना घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

आरोपींच्या अटकेसाठी पोलीस तपास

मिर्झापूरचे पोलिस अधीक्षक अजय कुमार सिंह यांच्या माहितीनुसार रात्री 1 वाजता अमरदीप सिंह यांची मिरवणूक कटरा कोतवालीच्या सरयू उद्यान विवाह हॉलमध्ये आली, यावेळी कोणीतरी केलेल्या गोळीबारात गोळी वासलिगंजचा रहिवासी असलेल्या आशिष गुप्ताच्या पोटात लागली आणि त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी एक पथक तैनात करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

गोड बोलून तरुणाला जाळ्यात अडकवलं, मागितली एक लाखाची खंडणी, औरंगाबादध्ये हनी ट्रॅपची केस!

महाविद्यालयीन तरुणावर अनैसर्गिक अत्याचार, व्हिडीओ शूट करुन धमकी, सांगलीत पोलिसावर गुन्हा

‘मुलगी कमावते, तू आरामात बसून खातोस?’ बापाने लेकीचं कुंकू पुसलं, पाय कापून जावयाची हत्या

Follow Us