अंमली पदार्थांची तस्करी करणारे नायजेरियन पोलिसांच्या रडारवर, अवैध दारुविक्री करणाऱ्या सहा जणांना अटक

| Updated on: Dec 06, 2020 | 12:24 AM

नायजेरियन नागरिक महिला साथीदाराच्या मदतीने हॉटेलमध्ये अवैध मद्यविक्री करत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून जवळपास 16 हजार रुपयांची दारु जप्त केली आहे (Vashi Police arrest six Nigerian).

अंमली पदार्थांची तस्करी करणारे नायजेरियन पोलिसांच्या रडारवर, अवैध दारुविक्री करणाऱ्या सहा जणांना अटक
Follow us on

नवी मुंबई : गुन्हेगारीच्या घटनांमध्ये परदेशी नागरिकांचे वाढते प्रमाण पोलिसांसाठी डोकेदुखी बनली आहे. वाशीमध्ये सहा नायजेरियन नागरिक अवैधपणे दारुविक्री करताना पकडले गेले आहेत. त्यामुळेच आता शहरातील परदेशी नागरिकांच्या हालचालींवर पोलीस विशेष लक्ष ठेवणार आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी याबाबत एक परिपत्रक काढले असून सर्व पोलीस ठाण्यात ते पाठवण्यात आले आहे. या परिपत्रकात त्यांनी सतर्क राहण्याचा आदेश दिला आहे (Vashi Police arrest six Nigerian).

वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली कि, जुहू गाव परिसरात साई दर्शन बिल्डिंगमध्ये काही परदेशी नागरिक बेकायदेशीरपणे राहत आहेत. पोलिसांनी संबंधित इमारतीमध्ये छापा टाकला. यावेळी त्यांना इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर नायजेरियन नागरिकांकडून अवैध हॉटेल चालवलं जात असल्याचं निदर्शनास आलं.

नायजेरियन नागरिक महिला साथीदाराच्या मदतीने हॉटेलमध्ये अवैध मद्यविक्री करत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून जवळपास 16 हजार रुपयांची दारु जप्त केली आहे. त्याचबरोबर याप्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या नायझेरियन नागरिकांचे नाव ओबीओरा आनीववेवा, प्रिन्स ओकी जॉन, अहोमो इले हेलन, चुकुडी लुके उसळोआर, नलोमोरीस कॉसमॉस चीनन्ये, ओकेयो तुचुकोया फिलिप असं आहे .

नवी मुंबईत राहणाऱ्या परदेशी नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातही प्रामुख्याने नायजेरियन लोकांची संख्या जास्त आहे. हे परदेशी विद्यार्थी व्हिसावर मुंबईत शिक्षणासाठी येतात. मात्र अनेक गुन्ह्यांमध्ये हे परदेशी नागरिक सामील असल्याचे आढळून आले आहे. अंमली पदार्थाच्या व्यवहारात बहुतांश आरोपी परदेशी आहेत. याचबरोबर ऑनलाईन घोटाळ्यातही प्रमुख आरोपी परदेशी नागरिकच असल्याचे समोर आले आहेत.

हे परदेशी नागरिक विद्यार्थी व्हिसा घेऊन भारतात येतात आणि नंतर येथेच स्थायिक होतात. त्यामुळे या परदेशी नागरिकांच्या कागदपत्राची तपासणी करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. ज्या परदेशी नागरिकाचा व्हिसा संपला असेल त्यांना त्वरित कारवाई करून परत पाठविण्यात येणार आहे. हे परदेशी नागरिक जुहू गाव, बोनकोडे, कोपरखैरने, बेलापूर, नेरुळ, खारघर, उलवे परिसरात राहतात. मुंबईलगतचे भाग, स्वस्तात घरे आणि वेळ कमी यामुळे ते हा भाग निवडतात.

याआधी देखील मुंबईत अंमली पदार्थाची तस्करी याच परदेशी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात होत असल्याचे अंमली पदार्थ विरोधी शाखेकडून सांगण्यात आले होते. उलवे, खारघर आणि इतर भागांत आफ्रिकन देशांतील नागरिक बेकायदा राहत. तसेच त्यातील अनेक परदेशी नागरिक हे गुन्हेगारी कारवाया करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी 2018-19 या वर्षात उलवे, खारघर आणि इतर भागांत छापेमारी करून त्या ठिकाणी राहणाऱ्या परदेशी नागरिकांचे पासपोर्ट आणि व्हिसाची तपासणी केली होती.

या तपासणीत 54 विदेशी नागरिकांच्या व्हिसाची मुदत संपल्याचे आढळून आले. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या पारपत्र विभागाने या 54 परदेशी नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्या देशात रवाना केले. याशिवाय नवी मुंबई पोलिसांनी 2018 आणि 19 या दोन वर्षात वेगवेगळ्या ठिकाणी शोध मोहीम राबवून 70 घुसखोर बांगलादेशी नागरिकांची धरपकड केली. तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करून 77 बांगलादेशी नागरिकांची त्यांच्या देशात रवानगी केली.

यापुढेदेखील बेकायदा वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांचा आणि घुसखोर बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांची धरपकड करण्याची कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिस आयुक्त बिपीन कुमार सिह यांनी सांगितले.

गुन्हेगारी पार्श्‍वभूमी

नायजेरियन नागरिक पर्यटन, शिक्षण, व्यवसाय अथवा वैद्यकीय व्हिसावर भारतात प्रवेश करतात. त्यानंतर हे नायजेरियन अथवा शैक्षणिक व्हिसा मिळवून भारतात येतात. त्यानंतर ते या ठिकाणी आपले बस्तान मांडून, गैरधंदे करायला सुरुवात करतात. भारतात आलेले बहुतांश नायजेरियन नागरिक हे ऑनलाईन फसवणुकीच्या रॅकेटमध्ये सक्रिय असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यासोबत अनेक स्थानिक तरुण-तरुणी या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अनेक नायजेरियन नागरिकांच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतर देखील ते याच ठिकाणी राहत असल्याचे पोलिसांच्या कारवाईवरून आढळून आले आहे.

घुसखोरांचे बस्तान

पश्‍चिम बंगालमार्गे बेकायदा भारतात प्रवेश करणारे बांगलादेशी नागरीक हे नवी मुंबई परिसरात झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. यातील पुरुष मंडळी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये हमाली आणि बांधकाम साईटवर मिळेल ते काम करतात. तर महिला घरकाम करून आपला उदरनिर्वाह करतात. हे बांगलादेशी नागरिक कोणतीही कागदपत्रे न देता झोपडपट्टीत भाड्याने राहतात. त्यामुळे ते घुसखोर म्हणून ओळखले जातात. घरमालकाला त्यांच्याकडून चांगले भाडे मिळत असल्यामुळे, तेदेखील त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी करत नाहीत. त्यामुळे बांगलादेशी घुसखोर वर्षानुवर्षे या ठिकाणी राहतात.

हेही वाचा : ‘शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार, त्यांना अडवू नका’, संयुक्त राष्ट्राकडूनही मोदी सरकारला कानपिचक्या