मंगरुळपीर तालुक्यातील विद्यार्थ्याने जेईई परीक्षेत मारली बाजी, देशातून..

| Updated on: Apr 25, 2024 | 5:18 PM

नुकताच वाशिम जिल्हातील एका विद्यार्थ्याने मोठे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे अवघड समजली जाणारी जेईईच्या परीक्षेत विद्यार्थ्याने हे यश मिळवले आहे. आता या विद्यार्थ्यावर काैतुकाच्या वर्षाव होताना देखील दिसतोय. लोक सतत शुभेच्छा देताना देखील दिसत आहेत. हा विद्यार्थी ग्रामीण भागातील आहे.

मंगरुळपीर तालुक्यातील विद्यार्थ्याने जेईई परीक्षेत मारली बाजी, देशातून..
Nilkrishna Gajre
Follow us on

वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील बेलखेड गावच्या एका शेतकऱ्याच्या मुलाने जेईई परीक्षेमध्ये शंभर पैकी 100 परसेंटाईल मिळून देशात पहिला येत इतिहास रचलाय. त्यामुळे गावकऱ्यांसह जिल्हाभरातून त्याचे मोठे कौतुक केले जातंय. निलकृष्ण निर्मलकुमार गजरे या बारावीत शिकणाऱ्या मुलाने यावर्षी जेईईची परीक्षा दिली होती. नुकताच त्याचा निकाल लागलेला असून देशभरात 23 तर महाराष्ट्रातून 3 विद्यार्थ्यांनी शंभर पैकी 100 परसेंटाईल गुण मिळवलेत. त्यामध्ये ग्रामीण भागात राहणाऱ्या निलकृष्णचाही नंबर असून तो देशात पहिला प्रथम आलाय.

निलकृष्ण हा मध्यमवर्गीय शेतकऱ्याचा मुलगा असून त्याचे वडील हे गावी शेती करतात. त्यांचे अवघे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून आपले उच्च शिक्षणाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न मुलाने पूर्ण करावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे मुलाच्या शिक्षणावर सुरुवातीपासूनच त्यांनी भर दिला आणि त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकले. दहावीत 98 टक्के गुण मिळवून तो जिल्ह्यात प्रथम आला होता.

शेतीत येणाऱ्या सततच्या संकटामुळे शेती परवडत नसल्याने मुलाने उच्च शिक्षण घ्यावे आणि नोकरी करावी अशी निलकृष्णाच्या आजी आजोबांची इच्छा होती. मात्र निलकृष्णाच्या वडिलांना परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता आले नाही. पण आता नातू त्यांचे स्वप्न पूर्ण करत असून तो प्रथम आल्यामुळे त्यांनाही मोठा आनंद झालाय.

निलकृष्णाचे मुंबई आयआयटीला प्रवेश मिळवून कम्प्युटर इंजिनियर होण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी वडील म्हणून कितीही कष्ट घेण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही, असा विश्वास त्याच्या वडिलांनी व्यक्त केलाय. निलकृष्णाचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आल्यामुळे त्याच्या वडिलांना राज्यभरातून अभिनंदनचे फोन येत आहेत.

बरेच जण त्यांच्या मुलांसाठी ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत आणि निर्मलकुमार गजरे हे मोठ्या मनाने त्यांच्या मुलाने कशी तयारी केली याविषयी त्यांना मार्गदर्शन करत आहेत. जेईई सारख्या कठीण परीक्षेत ग्रामीण भागातील एका मुलाने 100 पैकी 100 परसेंटाईल मिळवून देशातून पहिले येणे निश्चितच इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणादायी आहे.