Goa Assembly Election : अखेर राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी; आमच्याशिवाय सरकार बनणार नाही, राऊतांचा दावा

| Updated on: Jan 19, 2022 | 7:02 PM

गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग राबवत या तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवावी सा प्रयत्न सुरु होता. त्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू होते. याबाबत काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चाही करण्यात आली होती. मात्र, त्याला काँग्रेसकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर आज मोठा निर्णय जाहीर केला.

Goa Assembly Election : अखेर राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी; आमच्याशिवाय सरकार बनणार नाही, राऊतांचा दावा
संजय राऊत, प्रफुल पटेल
Follow us on

पणजी : काँग्रेसनं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्यास नकार दिल्यानंतर अखेर गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीची घोषणा आज करण्यात आली. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. महत्वाची बाब म्हणजे या दोन्ही पक्षांनी काँग्रेसपुढे आघाडीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, त्याला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता जास्त वाट न पाहता या दोन्ही पक्षांनी आघाडी जाहीर केलीय. संजय राऊत यांनी यावेळी काँग्रेसला टोला लगावत नाराजी व्यक्त केलीय.

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे शेजारच्या गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग राबवत या तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवावी सा प्रयत्न सुरु होता. त्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू होते. याबाबत काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चाही करण्यात आली होती. मात्र, त्याला काँग्रेसकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर आज मोठा निर्णय जाहीर केला.

‘सर्व 40 नाही पण जास्तीत जास्त जागा जिंकू’

गोव्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढणार आहेत, तशी माहिती प्रफुल पटेल यांनी दिली. ‘महाविकास आघाडीने गोव्यात एकजुटीने लढावे असा आमचा प्रयत्न होता. त्यासाठी काँग्रेसकडे प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, आमचे प्रयत्न व्यर्थ ठरले. आमच्या प्रस्तावावर काँग्रेसचा होकार अथवा नकारही आला नाही. त्यामुळेच आम्ही काँग्रेसशिवाय पुढे जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी आणि शिवसेना गोव्यात एकत्रितपणे निवडणूक लढणार आहे. गोव्यातील सर्व 40 जागा आम्ही लढणार नाही, पण जास्तीत जास्त जागा आम्ही लढू’, असं पटेल यांनी सांगितलं. उमेदवारांची पहिली यादी आम्ही उद्या जाहीर करणार आहोत आणि तीन-चार दिवसांनंतर दुसरी यादी जाहीर केली जाईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

संजय राऊतांचा काँग्रेसला टोला

संजय राऊत यांनी यावेळी गोव्यात काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही तिन्ही पक्षांची आघाडी व्हावी असा आमचा प्रयत्न होता. महाराष्ट्रात निवडणुकीनंतर आघाडी झाली. मात्र गोव्यात निवडणूकपूर्व आघाडीसाठी आम्ही प्रयत्न केले. आमचे वरिष्ठ नेते काँग्रेसच्या वरिष्ठांशी बोलले. मी स्वत: काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा केली. मात्र काँग्रेसने त्यास प्रतिसाद दिला नाही. कदाचित गोव्यात स्वबळावर पूर्ण बहुमत मिळेल, असं काँग्रेसला वाटत आहे. त्यावर आम्हाला काहीही म्हणायचे नाही. आम्ही आता आमचा निर्णय घेतला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी गोव्यात एकत्र लढणार आहे, असं संजय राऊत म्हणाले. तसंच गोव्यात आम्हाला निश्चितपणे यश मिळेल. आमच्याशिवाय सरकार बनणार नाही अशी स्थिती गोव्यात निर्माण होईल. गोव्याची जनता योग्य तो कौल देईल आणि गोव्यातही महाराष्ट्रासारखं एक सक्षम सरकार येईल याचा आम्हाला विश्वास वाटतो, असा दावाही राऊत यांनी केलाय.

इतर बातम्या :

Nagar Panchayat Election Result : ‘निकाल काँग्रेससाठी समाधानकारक, जनतेनं भाजपला नाकारलं’, नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

नगर पंचायत निवडणूक निकालावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, भाजपच क्रमांक एकचा पक्ष असल्याचा दावा