
कित्येक वर्षांपासून रखडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान करण्यात आले. तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी झाली. यावेळी महायुतीमधील काही पक्ष स्वबळावर लढताना दिसते. पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अनेक ठिकाणी अपयश मिळाल्याचे चित्र आहे. पुण्यात तर अजित दादांचा दणदणीत पराभव झाला आहे. आता यावर एका बड्या नेत्याने वक्तव्य केले आहे. या नेत्याने सांगितलेल्या कारणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
काय म्हणाला बडा नेता?
बीडच्या शिरूर तालुक्यात आयोजित एका कार्यक्रमावेळी लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अजित दादाची राष्ट्रवादी का संपली यामागचे कारण सांगितले आहे. राज्यात झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसी नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांना रणांगणात उतरवलेच नाही. ही माणसं निवडणुकीपासून दूर होते म्हणूनच अजित दादाची राष्ट्रवादी संपली अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
राष्ट्रवादी ही काही ठराविक लोकांची झाली आहे त्यामुळेच ही वेळ आली आहे. शरद पवारांच्या पक्षाला देखील अनेक ठिकाणी भोपळा मिळाला आहे. ओबीसीला दूर ठेवणार असाल तर तुमच्या हाती भोपळाच येणार आहे असे देखील हाके यांनी म्हटले आहे.
अजित पवारांनी महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गटासोबत युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. पण, त्यांचा हा निर्णय चुकला असल्याचे चित्र आहे. अजित पवार यांना चांगलाच फटका बसला आणि पिंपरी चिंचवडसह पुणे महापालिका त्यांच्या हातून गेली. 2017ला झालेल्या निवडणुकीच्या वेळी भाजपाने पुण्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेत स्वत:ची सत्ता आणली. इतकच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातून पिंपरी चिंचवड महापालिकेत एकहाती सत्ता आणली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बड्या नेत्यांना सोबत घेत भाजपने खेळी केली. पण यावेळी स्वबळावर लढल्यामुळे हातून सत्ता गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लढवण्यासाठी अजित पवार पुन्हा शदर पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युतीचे करून निवडणुका लढवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.