
सिनेसृष्टीमध्ये कलाकारांचे पडद्यावरील आयुष्य आणि खरे आयुष्यात यात जमीन आसमानाचा फरक असतो. रुपेरी पडद्यावर दिसणारे सुंदर आणि आकर्षक आयुष्य ते खरच खऱ्या आयुष्यात जगतात का? असा प्रश्न अनेकांना पडतो. कधीकधी कलाकारांसोबत असे काही घडते ज्याची कल्पना आपण करुही शकत नाही. 24 वर्षांपूर्वी एका 20 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू झाला होता. आता तिच्या मृत्यूबाबत कोर्टाने निकाल दिला आहे. नेमकं काय झालं होतं जाणून घ्या…
कोण आहे ती अभिनेत्री?
सुप्रीम कोर्टाने 24 वर्षांपूर्वी जगाचा निरोप घेतलेल्या तेलुगु अभिनेत्री प्रत्युषाच्या मृत्यूबाबत मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट म्हटले आहे की, तिचा मृत्यू गळा दाबून नव्हे तर ऑर्गेनोफॉस्फेट विषाच्या परिणामामुळे झाला. कोर्टाने या खटल्यातील आरोपी गुडिपल्ली सिद्धार्थ रेड्डीची शिक्षा कायम ठेवली. त्याच्यावर आयपीसीच्या कलम ३०६ अंतर्गत आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा दोष सिद्ध झाला होता.
जस्टिस राजेश बिंदल आणि जस्टिस मनमोहन यांच्या खंडपीठाने सर्व अपील फेटाळून लावल्या. कोर्टाने हेही सांगितले की, रुग्णालयात आणले जाण्याच्या वेळी प्रत्युषा जीवंत होती. तिने स्वतः डॉक्टरांना सांगितले होते की, तिने कीटकनाशक (कीटक मारण्याची औषध) प्यायले आहे. म्हणून दाबून मारण्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. हा खटला आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या 28 डिसेंबर 2011 च्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात पोहोचला होता. उच्च न्यायालयाने शिक्षा कमी करून दोन वर्षांची केली होती आणि दंड वाढवला होता.
24 वर्षांपूर्वी मृत्यूचे कारण चुकीचे सांगितले गेले होते
वादाची सुरुवात 25 फेब्रुवारी 2002 च्या शवविच्छेदन अहवालाने झाली. डॉ. बी. मुनी स्वामी यांनी आपल्या अहवालात लिहिले होते की, मृत्यूचे कारण ‘गळ्यावर दबाव आणि मॅन्युअल स्ट्रॅंग्युलेशनमुळे दम घुटणे’ आहे. मात्र, त्यांनी तपासणीसाठी अंतर्गत अवयव सुरक्षित ठेवले होते. याच अहवालाच्या आधारावर खून आणि लैंगिक शोषणाचे आरोप लावले गेले होते, ज्यांची नंतर सविस्तर चौकशी झाली. आंध्र प्रदेश फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या तपासात अभिनेत्रीच्या शरीर आणि पोटातील नमुन्यांमध्ये ऑर्गेनोफॉस्फेट विष आढळले.
CBI चौकशीत उघडकीस आले अनेक रहस्य
यानंतर राज्य सरकारने तीन तज्ज्ञांची समिती स्थापन केली. समितीने स्पष्ट केले की, मृत्यू ऑर्गेनोफॉस्फेट विषामुळे झाला. त्यांनी हेही सांगितले की, गळा दाबणे किंवा लैंगिक शोषणाचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. अहवालात शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या मतावर प्रश्न उपस्थित केले गेले. प्रकरण नंतर CBI कडे सोपवण्यात आले. तपास यंत्रणेने AIIMS च्या डॉक्टरांची मते घेतली. 2 मे 2002 रोजी AIIMS च्या टीमनेही स्पष्ट केले की, मृत्यू ऑर्गेनोफॉस्फोरस विषामुळे झाला.