याला म्हणतात संधीचं सोनं करणं, 3 सुपरस्टारचा नकार, 24 तासात अक्षय खन्नाचा मोठा निर्णय अन् बदललं नशीब

साऊथसह बॉलिवूडमधील या दोन मोठ्या कलाकारांनी नाकारली 'धुरंधर'मधील रहमान डकैतची भूमिका. अक्षय खन्नासाठी 24 तास ठरले सर्वात महत्त्वाचे.

याला म्हणतात संधीचं सोनं करणं, 3 सुपरस्टारचा नकार, 24 तासात अक्षय खन्नाचा मोठा निर्णय अन् बदललं नशीब
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 04, 2026 | 2:30 PM

Akshaye Khanna : बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्यांमध्ये अक्षय खन्नाचं नाव विशेष आदराने घेतलं जातं. आपल्या शांत आणि प्रभावी अभिनयाने तो पडद्यावर वेगळी छाप पाडतो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटात त्याने साकारलेली ‘रहमान डकैत’ ही खलनायकाची भूमिका प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारी ठरली आहे. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत असलं तरी या भूमिकेमागची एक रंजक गोष्ट आता समोर आली आहे.

ही भूमिका स्वीकारण्यापूर्वी बॉलिवूड आणि साऊथमधील तीन मोठ्या अभिनेत्यांनी ही भूमिका नाकारली होती. प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला. त्यांनी सांगितलं की, काही अभिनेत्यांना हा चित्रपट ‘एन्सेंबल कास्ट’ वाटला आणि मुख्य फोकस रणवीर सिंग याच्यावर असल्यामुळे त्यांनी ही भूमिका करण्यास नकार दिला.

मुकेश छाब्रा यांच्या मते, ‘एका साऊथ अभिनेत्यासह दोन बॉलिवूड अभिनेत्यांनी हा रोल नाकारला. त्यांना वाटलं की हा पूर्णपणे रणवीर सिंगचा चित्रपट आहे.’ मात्र, त्या तिघांनी घेतलेला हा निर्णय नंतर त्यांच्यासाठी चुकीचा ठरला असावा अशी चर्चाही रंगत आहे.

अक्षय खन्नाच्या भूमिकेला मोठं यश

जेव्हा मोठे कलाकार या भूमिकेबाबत विचार करत होते, तेव्हा अक्षय खन्नाने वेगळाच दृष्टिकोन दाखवला. त्याने स्क्रिप्ट ऐकली आणि ती ‘शानदार’ असल्याचं सांगत अवघ्या 24 तासांत चित्रपटासाठी होकार दिला. इतर कलाकार स्क्रीन टाइम आणि महत्त्वाच्या भूमिकेचा विचार करत असताना अक्षय खन्नाने फक्त कथेवर आणि पात्रावर विश्वास ठेवला.

त्याचा हा निर्णय त्याच्या करिअरसाठी ‘मास्टरस्ट्रोक’ ठरला. ‘रहमान डकैत’च्या भूमिकेत त्याने दाखवलेला क्रूर आणि भयानक अंदाज प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला आहे. आज धुरंधरच्या यशामागे रणवीर सिंग सोबतच अक्षय खन्नाच्या भूमिकेलाही मोठं श्रेय दिलं जात आहे.

1000 कोटी रुपयांहून अधिक कमाई

या चित्रपटाची कथा कराचीतील ल्यारी परिसरातील गँगवॉर आणि सत्तासंघर्षावर आधारित आहे. यात कंधार विमान अपहरण, 2001 मधील संसद हल्ला आणि 26/11 मुंबई हल्ल्यांसारख्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गुप्त कारवायांचं चित्रण करण्यात आलं आहे.

चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असून, त्यांच्यासोबत संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. दोन भागांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1000 कोटी रुपयांहून अधिक कमाई करत अनेक विक्रम मोडले आहेत.

Follow Us