कॉलेजच्या कट्ट्यावर गाजलेलं हे गाणं, 34 वर्षांनंतरही तरुणांच्या मनावर करतंय राज्य, तुम्ही ऐकलं का?

90 च्या दशकातील कॉलेजमधील तरुण-तरुणींचं सर्वात आवडतं गाणं, जे कॉलेज संपल्यानंतर प्रत्येक मुलाच्या ओठांवर असतं. 34 वर्षानंतरही प्रचंड सुपरहिट. तुम्ही ऐकलं का?

कॉलेजच्या कट्ट्यावर गाजलेलं हे गाणं, 34 वर्षांनंतरही तरुणांच्या मनावर करतंय राज्य, तुम्ही ऐकलं का?
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 12, 2026 | 9:03 PM

हिंदी चित्रपटात 90 च्या दशकात कॉलेज, मैत्री, प्रेम आणि विरह यांवर आधारित अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्याकाळातील काही गाणी तर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणांच्या मनाचा आवाजच बनली होती. असंच एक गाणं म्हणजे ‘कल कॉलेज बंद हो जाएगा’. 34 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या गाण्याने कॉलेज संपल्यानंतर होणारी मित्र-मैत्रिणींची आणि प्रेमी युगुलांची ताटातूट अगदी हळुवारपणे मांडली.

1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जान तेरे नाम’ या चित्रपटातून रोनित रॉय आणि फरहीन यांनी मुख्य कलाकार म्हणून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. दीपक बलराज विज यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं तर जिमी निरुला हे चित्रपटाचे निर्माते होते.

चित्रपटात रोनित रॉयने सुनील तर फरहीनने पिंकी मल्होत्रा ही भूमिका साकारली होती. विजय अरोरा, सुलभा देशपांडे, रवी बसवानी आणि बलविंदर धामी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले.

कॉलेजच्या प्रेमाची आणि गैरसमजाची कहाणी

‘जान तेरे नाम’ची कथा कॉलेजमधील लोकप्रिय आणि सुंदर मुलगी पिंकी मल्होत्रा आणि सुनील यांच्या प्रेमाभोवती फिरते. पिंकीचे अनेक चाहते असले तरी तिचं मन सुनीलसाठी धडधडत असतं. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि कॉलेज पूर्ण झाल्यानंतर लग्न करण्याचं स्वप्न पाहतात.

मात्र, कथेत पुढे गैरसमज निर्माण होतो. सुनील दुसऱ्या मुलीसोबतही नात्यात असल्याचा पिंकीचा गैरसमज होतो. त्यामुळे ती सुनीलपासून दूर जाते आणि विक्कीच्या जवळ येऊ लागते. याच भावनिक प्रवासात चित्रपटातील गाणी कथेला आणखी प्रभावी बनवतात.

‘कल कॉलेज बंद हो जाएगा’ आजही का लक्षात राहतं?

कॉलेज संपणं म्हणजे केवळ शिक्षणाचा एक टप्पा संपणं नाही तर मित्र-मैत्रिणींपासून आणि आपल्या खास व्यक्तीपासून दूर जाण्याची भीतीही असते. ‘कल कॉलेज बंद हो जाएगा’ या गाण्यात नेमकी हीच भावना व्यक्त करण्यात आली होती.

कॉलेजमधील शेवटचे दिवस, मित्रांसोबत घालवलेला वेळ आणि प्रिय व्यक्तीपासून होणारी ताटातूट यामुळे निर्माण होणारी बेचैनी या गाण्यातून जाणवते. त्यामुळे 90 च्या दशकातील अनेक कॉलेज विद्यार्थ्यांच्या प्लेलिस्टमध्ये हे गाणं आवर्जून असायचं. आजही हे गाणं ऐकलं की त्या काळातील कॉलेज रोमांस आणि जुन्या आठवणी ताज्या होतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us