Aamir Khan: आमिर खान याच्याकडून अखेर ‘या’ धक्कादायक निर्णयाची घोषणा; सांगितलं निर्णयामागचं नेमकं कारण

Aamir Khan: आमिर खानने अखेर हा धक्कादायक निर्णय घेतलाय, फॅन्स हा निर्णय सहज स्वीकारणार नाहीत, पण आमिरने व्यक्त केली निर्णयामागची महत्त्वाची भूमिका

Aamir Khan: आमिर खान याच्याकडून अखेर या धक्कादायक निर्णयाची घोषणा; सांगितलं निर्णयामागचं नेमकं कारण
Aamir Khan
Image Credit source: Twitter
| Updated on: Nov 16, 2022 | 12:51 PM

दिल्ली- तब्बल चार वर्षांनंतर आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’नंतर आमिरने पुढचा चित्रपट प्रदर्शित करण्यास बराच अवधी घेतला. प्रेक्षकांना त्याच्या या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता होती. मात्र बॉक्स ऑफिसवर ‘लाल सिंग चड्ढा’ला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आता आमिरचा पुढचा कोणता प्रोजेक्ट असणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. अखेर आपल्या करिअरबाबत आमिरने मोठा आणि तितकाच धक्कादायक निर्णय घेतला आहे. दिल्लीतल्या एका कार्यक्रमात त्याने आपला हा निर्णय जाहीर केला. त्याचसोबत त्यामागची महत्त्वाची भूमिकाही मांडली.

आमिरचा मोठा निर्णय

आमिर खान पुढील दीड वर्ष अभिनयातून ब्रेक घेणार आहे. जवळपास 18 महिने तो रुपेरी पडद्यापासून लांब राहणार आहे. आमिरचा हा निर्णय त्याच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. मात्र असा निर्णय घेण्यामागचं कारणही त्याने स्पष्ट केलं आहे.

ब्रेक घेण्यामागचं कारण काय?

कामातून काही काळ ब्रेक घेऊन कुटुंबीयांना तो वेळ देणार असल्याचं आमिरने सांगितलं. “जेव्हा मी अभिनेता म्हणून चित्रपटात काम करतो, तेव्हा त्या कामात मी पूर्णपणे व्यग्र होऊन जातो. माझ्या जीवनात दुसरं काहीच उरत नाही. याच कारणामुळे मी ब्रेक घेतोय. मला माझ्या कुटुंबीयांसोबत राहायचंय. माझी आई, माझ्या मुलांसोबत वेळ घालवायचा आहे. गेल्या 35 वर्षांपासून मी फक्त कामच करतोय. मी फक्त माझ्या कामाकडेच पूर्ण लक्ष देतोय आणि जे लोक माझ्या जवळचे आहेत, त्यांच्यासाठी ही बाब योग्य नाही”, असं तो म्हणाला.

निर्माता म्हणून करणार काम

आमिरने अभिनयातून ब्रेक घेतला असला तरी निर्माता म्हणून तो त्याचं काम सुरूच ठेवणार आहे. “पुढील दीड वर्ष मी एक अभिनेता म्हणून नाही तर एक निर्माता म्हणून काम करणार आहे,” असं तो पुढे म्हणाला. आगामी ‘चॅम्पियन्स’ या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचंही त्याने जाहीर केलं.

लॉकडाऊनदरम्यान इंडस्ट्री सोडण्याचा केला होता विचार

आमिरने कोरोना महामारीच्या काळातच फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा विचार केला होता. मात्र ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी हा कुठला मार्केटिंग फंडा आहे, असं वाटू नये म्हणून त्याने निर्णय जाहीर केला होता. आमिरची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव हिने त्याच्या या निर्णयाला विरोध केला होता. एका मुलाखतीत आमिरने याबद्दलचा खुलासा केला होता.

कुटुंबीयांना पुरेसा वेळ दिला नसल्याची खंत

एका मुलाखतीत आमिरने त्याच्या कुटुंबीयांना पुरेसा वेळ दिला नसल्याची खंत बोलून दाखवली होती. “मी 18 वर्षांचा असताना इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यावेळी मी इंडस्ट्रीत इतका गुंतून गेलो की मला खूप काही शिकायची इच्छा निर्माण झाली. पण आज मला जाणवतं की माझ्या जवळच्या व्यक्तींना मी पुरेसा वेळ देऊ शकलो नाही. मी माझा पूर्ण वेळ कामासाठी दिला आणि कामासोबतचं नातं घट्ट केलं. माझं कुटुंब माझ्यासोबत नेहमीच राहील असं मी गृहीत धरलं. त्यावेळी मला प्रेक्षकांची मनं जिंकायची होती. त्या वाटेत मी इतका हरवून गेलो मी माझं कुटुंब माझी वाट पाहतंय हे विसरूनच गेलो होतो”, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या होत्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us