लग्न अर्जुन तेंडुलकरचं पण चर्चा मात्र अभिषेक-ऐश्वर्याचीच; जोडीवर खिळल्या सर्वांच्या नजरा

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचं नुकतंच धूमधडाक्यात लग्न पार पडलं. या लग्नसोहळ्याला अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती होती. मात्र या सर्वांत अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय या जोडीवरच सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.

लग्न अर्जुन तेंडुलकरचं पण चर्चा मात्र अभिषेक-ऐश्वर्याचीच; जोडीवर खिळल्या सर्वांच्या नजरा
Abhishek Bachchan and Aishwarya Rai
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 06, 2026 | 1:10 PM

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचं गुरुवारी 5 मार्च 2026 रोजी सानिया चंढोकशी लग्न झालं. मुंबईत हा लग्नसोहळा पार पडला. अर्जुन आणि सानियाच्या लग्नाचं अनेक सेलिब्रिटींना आणि नामवंत व्यक्तींना आमंत्रण होतं. यात बॉलिवूड कलाकारांचाही समावेश होता. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन, शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी, मुलगी सुहाना यांच्यासोबतच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनसुद्धा लग्नसोहळ्याला पोहोचले होते. हा लग्नसोहळा जरी अर्जुनचा असला तरी जेव्हा अभिषेक आणि ऐश्वर्या विवाहस्थळी पोहोचले, तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. या जोडीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंढोकच्या लग्नसोहळ्यात ऐश्वर्याने निळ्या रंगाचा भरजरी सूट परिधान केला होता. तर अभिषेकने काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा लांब सूट घातला होता. गाडीमधून उतरताच या दोघांनी पापाराझींसमोर फोटो आणि व्हिडीओसाठी पोझ दिले आणि त्यानंतर हातात हात घालून ते कार्यक्रमात सहभाग होण्यासाठी पुढे निघून गेले. गेल्या काही महिन्यांपासून अनेकदा ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या. याआधी अनंत अंबानीच्या लग्नात हे दोघं वेगवेगळे आले होते, तेव्हापासून घटस्फोटाच्या चर्चा अधिक तीव्र झाल्या होत्या. या चर्चांवर अखेर अभिषेकने मौन सोडलं होतं. माझ्या बायकोला माझं सत्य माहीत आहे आणि मला तिचं सत्य माहीत आहे. आमचं कुटुंब आनंदी आणि निरोगी आहे. हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे, अशी थेट प्रतिक्रिया त्याने दिली होती.

अभिषेक आणि ऐश्वर्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत आहे आणि दोघांची जोडीही छान वाटतेय, असं एकाने लिहिलं. तर ‘आता हे दोघं क्लासिक सीनिअर कपलसारखे दिसत आहेत’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘या दोघांना पुन्हा असं एकत्र पाहून खूप आनंद होतोय’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

ऐश्वर्या आणि अभिषेकने 2007 मध्ये लग्न केलं. तर 2011 मध्ये ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नातही अभिषेक त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांसोबत पोहोचला होता. मात्र फक्त ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या वेगळ्या आल्या होत्या. यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना आणखी हवा मिळाली होती. याआधी 2014 मध्येही या दोघांच्या नात्यात काही आलबेल नसल्याच्या चर्चा होत्या.

Follow Us